धक्कादायक! सामायिक बांधाच्या वादातून शेतकऱ्याचा खून; दोघा भावांवर खुनाचा गुन्हा दाखल सोलापूर जिल्ह्यातील घटना..
सामायिक बांधाच्या वादाचा राग मनात ठेवून तसेच चारीमध्ये लिंबाच्या फांद्या टाकल्याच्या कारणावरून खून झाल्याची घटना
करमाळा तालुक्यातील अर्जुननगर येथे दि.७ जून रोजी सकाळी ९.३० च्या सुमारास घडलेली आहे.
यामध्ये दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. भुजंग सावळा रोकडे (वय ६५) असे खून झालेल्या शेतकऱ्याचे नाव असून,
तात्याबा बाबुराव रोकडे व नागनाथ ऊर्फ नागेश बाबुराव रोकडे अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
याबाबत सतीश भुजंग रोकडे यांनी फिर्याद दिली असून त्यामध्ये म्हटले आहे की, सामायिक बांधावर असलेले लिंबाचे झाड तात्याबा रोकडे व नागनाथ ऊर्फ नागेश रोकडे यांनी तोडून
त्याच्या फांद्या चारीत टाकल्या असता भुजंग रोकडे यांनी त्यांना अडविले व चारी बंद करण्यास अटकाव केला.
त्यामुळे चिडून तात्याबा रोकडे व नागनाथ ऊर्फ नागेश रोकडे यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व तू नेहमी आमच्याशी वाद घालत असतो,
असे म्हणत तात्याबा रोकडे याने चाकूने छातीवर डाव्या बाजूस भोसकले.
यात भुजंग रोकडे यांचा मृत्यू झाला. याबाबत करमाळा पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून पोलीस निरीक्षक रणजित माने यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास सुरू आहे.
0 Comments