सोलापूर जिल्ह्यातही लागणर आता स्मार्ट प्री पेड विद्युत मीटर !
वीज चोरीने विद्युत महामंडळ जेरीला आलेले असतानाच आता सोलापूर जिल्ह्यातही प्रीपेड विद्युत मीटर बसवले जाणार असून जानेवारी महिन्यापासून या मोहिमेला सुरुवात होणार आहे.
विद्युत कंपनी कायम आर्थिक अडचणीत असते, शिवाय खर्च आणि वसुली यांचा ताळमेळ कधीच बसत नाही. वीज गळती, वीज चोरी तसेच थकीत वसुली यामुळे विद्युत कंपनी जेरीला आली आहे.
विजेची चोरी मोठ्या प्रमाणात होत असते आणि या चोरांच्या विरोधात कारवाई देखील होत असते पण ही चोरी थांबताना दिसत नाही, कित्येकदा याला विद्युत कर्मचारीही जबाबदार असतात, सतत वेगवेगळ्या प्रकारचे मिटर बसविण्यात आले.
तरी देखील विजेच्या चोऱ्या होतच असतात. विशेषत: मोठ्या औद्योगिक कंपन्या आणि ग्रामीण भागात चोरीचे प्रमाण मोठे असते. आता मात्र महावितरणने प्रीपेड मीटर आणले असून, 'आधी पैसे भर आणि मगच वीज घ्या' असा उपाय करण्यात आला आहे.
राज्यभर महावितरण आता प्रीपेड मीटर बसवत आहे, मोबाईलप्रमाणे आधी पैसे भरून रिचार्ज करावा लागणार आहे आणि नंतर तेवढ्या रकमेची वीज वापरता येणार आहे.
आता सोलापूर जिल्ह्यातही वीज ग्राहकांना असे मीटर देण्यात येणार असून, मीटर बदलण्याचे काम येत्या जानेवारी पासून सुरु होणार आहे. सोलापुरातून याची सुरुवात केली जाणार आहे.
या मीटरमुळे मीटर रीडिंगमध्ये होत असलेला गोंधळ, जादाचे विद्युत बिलाच्या तक्रारी दूर होतील असे महावितरण सांगत आहे पण त्याबरोबरच वीज चोरीला देखील आळा बसणार असल्याचे महावितरणकडून सांगण्यात येवू लागले आहे.
या नव्या पद्धतीत सगळ्याच वीज ग्राहकांचे मीटर बदली केले जाणार असून नवे स्मार्ट मीटर दिले जाणार आहेत. ग्राहकांसाठी हे मीटर मोफत असणार आहेत.
हे नवे मीटर बसविल्यानंतर अगोदरच पैसे भरून वीज वापरता येणार आहे, जेवढे पैसे आधी भरले असतील तेवढीच वीज वापरता येणार आहे. ग्राहक वापरत असलेल्या विजेची माहिती
ग्राहकाला मिळत राहणार आहे त्यामुळे आपण किती रुपयांची वीज वापरली आहे आणि किती रक्कम शिल्लक राहिली आहे याची देखील माहिती मिळणार आहे.
या स्मार्ट प्री पेड मीटरमुळे भरलेले पैसे संपले की मोबाईलवर संदेश येणार आहे, भरलेल्या रकमेएवढी वीज वापरली की वीज आपोआप बंद होणार आहे पण रात्रेच्या वेळी पैसे संपले तर मात्र वीज बंद होणार नाही.
पैसे रात्री संपल्यास त्याचदिवशी सायंकाळी सहा ते सकाळी १० या वेळेत वीजपुरवठा खंडित होणार नाही. सकाळी बिल भरून वीजपुरवठा सुरळीत करता येणार आहे.
शहरात घरगुती, व्यावसायिक ग्राहक २ लाख २१ हजार १६० असून, ग्रामीण पाणीपुरवठा, पथदिव्यांचे ग्राहक २ लाख २४ हजार ४७६ एवढे आहेत. ७ लाख ५० हजार एवढे मीटर सोलापूर जिल्ह्यात बसविण्यात येणार आहेत.
पहिल्या टप्प्यात २ लाख २५ हजार प्रीपेड मीटर बसवले जाणार असून हे काम सुमारे दोन वर्षे चालणार आहे. याचा ठेका अदानी कंपनीला मिळालेला असून जानेवारी पासून शहरी भागात मिटर बसविण्याचे काम केले जाणर आहे. अशी माहिती मिळत आहे.
-
0 Comments