शालेय वयातच संशोधनाची बीजे पेरा; प्रत्येक विद्यार्थ्याने 'पेटंट'चा ध्यास घ्यावा : डॉ. अशोक नगरकर
अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सांगोला विद्यामंदिरात प्रेरणादायी व्याख्यान; डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या आठवणींना उजाळा
सांगोला | प्रतिनिधी देशाच्या प्रगतीसाठी केवळ परदेशी तंत्रज्ञानाचा वापर न करता, स्वतः नवनवीन संशोधन करून जागतिक स्तरावर भारताचे नाव उज्ज्वल करण्याची वेळ आली आहे.
त्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनापासूनच संशोधक वृत्ती विकसित होणे आवश्यक असून,
प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या कल्पनांना 'पेटंट'च्या माध्यमातून नवी ओळख मिळवून द्यावी, असे प्रेरणादायी आवाहन संरक्षण संशोधन व विकास संघटनेचे (DRDO) निवृत्त ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अशोक नगरकर यांनी केले.
सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सांगोला विद्यामंदिर प्रशाला व लायन्स क्लब ऑफ सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने 'संशोधन आणि पेटंट याचे विद्यार्थी दशेतील महत्त्व' या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. नगरकर यांनी संशोधनाची दिशा, नाविन्यपूर्ण विचार आणि पेटंटचे महत्त्व अत्यंत सोप्या भाषेत उलगडून सांगितले.
भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्यासोबत संशोधन करतानाच्या अनेक प्रेरणादायी आठवणी त्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडल्या. "कल्पना किती मोठी आहे यापेक्षा ती किती नाविन्यपूर्ण आहे,
हे अधिक महत्त्वाचे असते," असे सांगत त्यांनी स्टेपलरमधील शेवटच्या पाच पिनांना लाल रंग देण्याच्या छोट्याशा कल्पनेपासून ते वाहनांचे मायलेज वाढवणाऱ्या संशोधनापर्यंत अनेक उदाहरणे दिली.
भारतात दहा लाख लोकांमागे अवघे चार शास्त्रज्ञ असून विकसित देशांमध्ये हे प्रमाण सुमारे ४०० असल्याचे सांगत, योग्य मार्गदर्शन मिळाल्यास भारतातील ९५ टक्के विद्यार्थी उत्कृष्ट शास्त्रज्ञ बनू शकतात,
असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने विकसित केलेले पेटंट लाखो रुपयांना विकल्याचे उदाहरण देत विद्यार्थ्यांनी संशोधनाकडे करिअर म्हणूनही पाहण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमात ड्रीम फाउंडेशनचे संस्थापक काशीनाथ भतगुणकी यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधला. माजी राष्ट्रपती डॉ. कलाम यांना सायकलवरून दिल्ली गाठून भेटल्याचा प्रेरणादायी अनुभव त्यांनी सांगितला.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये मोठी क्षमता दडलेली असून, संस्थेच्या अमृतमहोत्सवी वर्षात किमान ७५ विद्यार्थी अधिकारी, शास्त्रज्ञ आणि संशोधक बनावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके होते. विद्यार्थ्यांच्या मनात विज्ञान आणि संशोधनाची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने अशा व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले.
यावेळी संस्था सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, प्राचार्य चारुदत्त जगताप, उपमुख्याध्यापक प्रदीप धुकटे, उपप्राचार्य शिवशंकर तटाळे, पर्यवेक्षक उत्तम सरगर,
काकासो नरूटे, शुभांगी घोंगडे, लायन्स क्लबचे अध्यक्ष प्रशांत रायचुरे, सचिन भालशंकर यांच्यासह शिक्षक, पालक, विद्यार्थी व विज्ञानप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात संस्थापक अध्यक्ष कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. प्राचार्य चारुदत्त जगताप यांनी प्रास्ताविक केले, प्रा. धनाजी चव्हाण यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. सूत्रसंचालन उन्मेश आटपाडीकर यांनी, तर आभार प्रदर्शन प्रशांत रायचुरे यांनी केले.



0 Comments