‘तीनपट पैशांचे आमिष’ ठरले महागात; सांगोल्यात शेतकऱ्याची ९ लाखांची फसवणूक
सांगोला तालुक्यात ‘पैसे तीनपट करून देतो’ असे आमिष दाखवत एका शेतकऱ्याची तब्बल ९ लाख रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
या प्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी शांतीलाल हणुमंत साळुंखे (वय ४८, रा. गायगव्हाण, ता. सांगोला, जि. सोलापूर) यांच्या राहत्या
घरी १४ एप्रिल २०२६ रोजी रात्री ८ ते १५ एप्रिल पहाटे ३ वाजण्याच्या दरम्यान आरोपी आले होते.
त्यांनी “१० लाखांचे ३० लाख करून देतो” असे सांगून साळुंखे यांचा विश्वास संपादन केला.
यानंतर आरोपींनी बोलण्यात गुंतवून हातचलाखीने साळुंखे यांच्याकडील ९ लाख रुपये घेतले आणि त्यांचा अपहार करून फसवणूक केली.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच साळुंखे यांनी तात्काळ सांगोला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या प्रकरणी चंदु विठ्ठलराव आर्शिद (रा. भिवंडी), रमेश विष्णु दंडी (रा. भिवंडी), सज्जन कोंडीबा पवार (रा. खंडाळी, ता. माळशिरस),
निलेश सिद्धे (रा. भिवंडी), मनोज सोनवणे (रा. शेगाव, जि. बुलढाणा) तसेच
एका अनोळखी इसमाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(४), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याची नोंद गु.र.न. ३११/२०२६ प्रमाणे करण्यात आली असून पोलीस हवालदार माने यांनी गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
दरम्यान, ‘पैसे दुप्पट-तिप्पट’ करून देण्याच्या आमिषांना बळी पडू नये, अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये
तसेच संशयास्पद हालचाल आढळल्यास त्वरित पोलिसांना कळवावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी केले आहे.


0 Comments