सांगोल्यात वनविभागा विरोधात शेतकऱ्यांचा संताप उसळला!
‘धरणे आंदोलन’ तीव्र;आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांचा इशारा
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला | प्रतिनिधी
सांगोला तालुक्यातील चोपडी येथे वनविभागाच्या निष्क्रिय आणि अकार्यक्षम
कारभाराविरोधात शेतकऱ्यांनी जोरदार एल्गार पुकारत वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे.
मागील दोन महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने अखेर शेतकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.
प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्था व जागरूक शेतकऱ्यांच्या वतीने वनपरिक्षेत्र कार्यालय
सांगोला, उपवनसंरक्षक कार्यालय सोलापूर तसेच मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करण्यात आला होता.
मात्र प्रशासनाकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने संतप्त शेतकरी मोठ्या संख्येने एकत्र येत ठिय्या आंदोलन करत आहेत.
उन्हाच्या तीव्रतेतही आंदोलन सुरू असून आंदोलनस्थळी तात्पुरत्या मंडपाची उभारणी करण्यात आली आहे.
आंदोलन पूर्णपणे शांततामय व संविधानिक मार्गाने सुरू असल्याचे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले.
🌱 मुख्य मागण्या काय?
चोपडी हद्दीत लागवड केलेल्या सुमारे १८ हजार रोपांना तातडीने पाणीपुरवठा करून त्यांचे संरक्षण करावे, ही प्रमुख मागणी आहे. याशिवाय—
रोपांच्या देखभालीतील मनुष्यबळात गैरप्रकारांची चौकशी
एजंटमार्फत वनजमीन चाऱ्यासाठी देण्याच्या कथित प्रकारांची चौकशी
जाळरेषा काढताना झाडांचे नुकसान करणाऱ्यांवर कारवाई
वनक्षेत्रातील नागरिकांवरील कथित छळ थांबवणे
स्वयंभू महादेव मंदिराचे संरक्षण
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमुळे होणाऱ्या नुकसानीवर उपाय
माहिती अधिकार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी
अशा अनेक मागण्या शेतकऱ्यांनी मांडल्या आहेत.
⚠️ गंभीर आरोपांनी खळबळ
काही अधिकाऱ्यांकडून एजंटमार्फत पैसे घेऊन वनजमीन चाऱ्यासाठी दिली जात असल्याचे गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केले आहेत.
तसेच २२ डिसेंबर २०२५ रोजी जाळरेषा काढताना शेतकऱ्यांनी जपलेल्या झाडांचे नुकसान झाल्याचीही खंत व्यक्त करण्यात आली.
🏛️ प्रशासनाची भूमिका अद्याप अस्पष्ट
या आंदोलनाची माहिती तहसीलदार, पोलीस निरीक्षक, सहाय्यक वनसंरक्षक तसेच मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली असली
तरी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. त्यामुळे तालुक्याचे लक्ष या आंदोलनाकडे लागले आहे.
📢 चौकट : आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख मैदानात; कडक इशारा
धरणे आंदोलनस्थळी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला.
यावेळी त्यांनी संबंधित वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी तत्काळ संपर्क साधून स्पष्ट शब्दांत सूचना दिल्या की—
👉 “ग्रामस्थांच्या रास्त मागण्यांवर त्वरित सकारात्मक निर्णय घ्या.”
👉 “बेकायदेशीर कारभार तात्काळ थांबवा.”
तसेच चोपडी परिसरातील १८ हजार झाडे जगवण्यासाठी शासनाकडून निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
आवश्यक असल्यास स्वतःच्या आमदारकीच्या पगारातूनही मदत करण्याची तयारी त्यांनी दर्शवली. यासोबतच संबंधित मंत्र्यांची मुंबईत भेट घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
👉 एकूणच, सांगोल्यातील हे आंदोलन आता अधिक तीव्र होण्याची चिन्हे असून प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास परिस्थिती चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.




0 Comments