धक्कादायक! बायको माहेराहून परत आली नाही… संताप-निराशेत पित्याचं टोकाचं पाऊल; तिन्ही लेकरांना विष पाजून स्वतःचाही जीव घेतला
सोलापूर | प्रतिनिधी सोलापूर जिल्ह्यातून हृदय पिळवटून टाकणारी आणि अंगावर शहारे आणणारी घटना समोर आली असून, कौटुंबिक वादातून एका पित्याने स्वतःच्या तीन
निष्पाप लेकरांना विष पाजून नंतर स्वतःही आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. या घटनेमुळे संपूर्ण पंचक्रोशी हादरली असून गावात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर सोलापूर तालुक्यातील तिऱ्हे गावात ही दुर्दैवी घटना घडली. भीमा अण्णा वाघमारे (वय ३४) असे मृत पित्याचे नाव आहे.
ते एका सिमेंट कंपनीत सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात आणि त्यांच्या पत्नीत कौटुंबिक कारणावरून तीव्र वाद सुरू होता.
वाद इतका वाढला की पत्नी माहेरी निघून गेली आणि पुन्हा सासरी येण्यास तिने स्पष्ट नकार दिला. नातेवाईकांनी समजूत काढण्याचे प्रयत्न केले, मात्र त्यात यश आले नाही. या मानसिक तणावातूनच भीमा वाघमारे यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचं समोर येत आहे.
घटनेच्या दिवशी त्यांनी आपल्या तीन लहान मुलांना – जानवी, प्रगती आणि बाबू – यांना वळसंग परिसरातील शेतात नेले. तिथे त्यांनी तिघांनाही विष पाजले आणि स्वतःही विष प्राशन केले.
या भीषण प्रकारात भीमा वाघमारे यांचा जागीच मृत्यू झाला, तर तिन्ही मुलांची प्रकृती अत्यंत गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी शेताकडे धाव घेतली आणि मुलांना तातडीने रुग्णालयात हलवले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.
या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून, कौटुंबिक वादाचे भीषण रूप पाहून नागरिकांत हळहळ व्यक्त केली जात आहे.


0 Comments