५० वर्षांची सत्ता गेल्यावर शहाजीबापूंची शेकापवर तोफ;
“पंचायत समितीच्या बोर्डाकडेही कधी पाहिलं नाही, एवढा भारी कारभार!”
सांगोला : सांगोला पंचायत समितीवर तब्बल ५० वर्षे असलेली शेतकरी कामगार पक्षाची सत्ता संपुष्टात आल्यानंतर माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी शेकापवर जोरदार टीका केली.
पंचायत समितीच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या सत्कार समारंभात बोलताना त्यांनी शेकापच्या कारभारावर थेट निशाणा साधत टोलेबाजी केली.
पाटील म्हणाले, “सांगोला पंचायत समितीचा कारभार आजपर्यंत कसा झाला
हे दीपक साळुंखेंना थोडं माहिती आहे, पण मला काहीच माहिती नाही. पंचायत समितीच्या इमारतीजवळ माझी गाडी आली
की मी दुसरीकडे तोंड करायचो. त्या पंचायत समितीचा बोर्ड वाचण्याचीसुद्धा आयुष्यात कधी भावना झाली नाही.
कारण तिथे एवढा ‘भारी’ कारभार झालेला होता.” अशा शब्दांत त्यांनी शेकापवर टीकास्त्र सोडले.
दरम्यान, सांगोला पंचायत समितीच्या सभापतिपदी भाजपच्या पूनम इंगवले तर उपसभापतिपदी शिवसेनेचे अजय सरगर यांची निवड झाली आहे.
या निवडीमुळे पंचायत समितीतील शेतकरी कामगार पक्षाची तब्बल पन्नास वर्षांची सत्ता संपुष्टात आली आहे.
यावेळी बोलताना पाटील यांनी सांगितले की, सांगोला पंचायत समिती आणि संभाजीराव शेंडे हे एकेकाळी अतूट समीकरण होते.
सभापतिपदाच्या माध्यमातून त्यांनी सांगोल्यात काँग्रेस जिवंत ठेवण्याचे काम केले. त्यांच्या सोबत उपसभापती म्हणून माजी आमदार काकासाहेब साळुंखे यांनीही काम केले होते.
संभाजीराव शेंडेंचे सभापतिपद काही राजकीय घडामोडींमुळे गेले होते. मात्र आज ५० वर्षांनंतर त्याच गावाला
पुन्हा सभापतिपद देण्याची संधी मिळाली, हा भगवंताचा मोठा आशीर्वाद असल्याचेही त्यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले की, पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सर्व निर्णय समजुतीने घेतल्यामुळे आज विजयाचा गुलाल उधळण्याची संधी मिळाली आहे.
तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात सांगोला तालुक्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला.
नव्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, पंचायत समितीत येणाऱ्या सर्वांत गरीब माणसाचे काम प्रथम झाले पाहिजे.
त्या दालनाचे पावित्र्य जपा आणि महायुतीच्या मंत्र्यांच्या मदतीने पुढील पाच वर्षे विकासाचा कारभार चालवा, असे आवाहनही त्यांनी केले.
तसेच बोराटवाडीत जे काही ठरले आहे त्याची जशाच्या तशी अंमलबजावणी झाली तरच तालुक्यातील जनतेचा विश्वास टिकून राहील.
कुणाच्याही सांगण्यावरून चुकीचा निर्णय घेतला तर तालुक्यातील पाच लाख जनतेचा विश्वास तुटू शकतो, असा इशाराही माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिला.


0 Comments