आरोग्य, रस्ते, लाईटसह पाणी व वसतीगृह प्रश्नांवर आमदार डॉ. देशमुख यांचा कडक पवित्रा
मुंबई | प्रतिनिधी मुंबईत सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात
सांगोला विधानसभा मतदारसंघातील विविध ज्वलंत प्रश्नांवर आमदार डॉ. भाई बाबासाहेब देशमुख यांनी आक्रमक भूमिका घेत
सभागृहात हल्लाबोल केला. आरोग्य सेवा, रस्ते व वीज (लाईट) समस्यांबरोबरच शेती पाण्याचा गंभीर मुद्दा उपस्थित करत त्यांनी सरकारचे लक्ष वेधले.
आमदार देशमुख यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करत सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांची पाण्यासाठी होत असलेली गैरसोय मांडली. त्यांनी स्पष्ट केले की, तालुक्यातील बहुतांश शेती टेंभु, म्हैसाळ आणि निरा उजवा प्रकल्पांवर
अवलंबून आहे. मात्र, सध्या उन्हाळी हंगामात पाणी सोडण्यात आलेले नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. उपलब्ध जलसाठ्याचे योग्य नियोजन व वितरण करण्यात प्रशासन अपयशी ठरल्याची टीकाही त्यांनी केली.
यावेळी त्यांनी टेंभु, म्हैसाळ आणि निरा उजवा प्रकल्पाचे आवर्तन तात्काळ सोडण्याची मागणी करत नदीकाठच्या बंधाऱ्यांमध्ये तातडीने पाणी साठवण्याचे निर्देश देण्याची मागणी सरकारकडे केली.
दरम्यान, सामाजिक प्रश्नांवरही आमदार देशमुख यांनी आवाज उठवला. राज्यातील अनेक तालुक्यांप्रमाणे सांगोला तालुक्यातही मागासवर्गीय मुला-मुलींसाठी वसतीगृहांची कमतरता
असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. सांगोल्यात वसतीगृहासाठी जागा उपलब्ध करून देऊन त्याच्या बांधकामासाठी निधी मंजूर करण्याची मागणी त्यांनी सभागृहात केली.
यावर समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सांगितले की, राज्यात नवीन वसतीगृहांसाठी मागील वर्षी सुमारे १२०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे.
सांगोला तालुक्यासाठी प्रस्ताव सादर केल्यास त्यास प्राधान्याने मंजुरी दिली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
एकूणच, आरोग्य, पायाभूत सुविधा, शेती पाणी व शिक्षणाशी संबंधित प्रश्नांवर आमदार डॉ. देशमुख यांनी घेतलेला आक्रमक पवित्रा चर्चेचा विषय ठरला आहे.


0 Comments