मोठी बातमी! डिसेंबर २०२७ पर्यंत उजनीतून ८ लाख एकर शेतीला मिळणार पाणी;
शिरापूर, एकरुख, बार्शी सिंचन योजना अंतिम टप्प्यात; भीमा-सीना नदीवर २१ बॅरेजेस, वाचा...
सोलापूर : जून १९८० मध्ये पूर्ण झालेल्या उजनीतून सध्या सोलापूर जिल्ह्यातील दीड लाख हेक्टरला पाणी मिळते. याशिवाय आता बार्शी, शिरापूर, देगाव, एकरुख, आष्टी, सांगोला व मंगळवेढा उपसा सिंचन योजनांची कामे सुरू आहेत.
शिरापूर, बार्शी, एकरुख योजना जून २०२६ पर्यंत पूर्ण होतील. देगाव, आष्टी, सांगोला, मंगळवेढा योजनांसाठी डिसेंबर २०२७ पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. त्यानंतर आणखी एक लाख ३४ हजार ७४६ हेक्टर शेतजमीन ओलिताखाली येणार आहे.
महाराष्ट्र स्थापनेनंतर १९६६, १९७२, २०१३, २०२३ या वर्षांत दुष्काळाचा सामना करावा लागला. गावागावातील लोकांचे स्थलांतर झाले. पण, जून १९८० मध्ये ११७ टीएमसी साठवण क्षमतेचे उजनी धरण झाले.
उजनीवर १२६ किलोमीटरचा उजवा आणि १३२ किलोमीटर लांबीचा डावा कालवा बांधला गेला. त्यातून एक लाख ४७ हजार ८०० हेक्टर जमिनीला पाणी मिळाले. सीना-माढा व दहिगाव उपसा सिंचन योजनांमधून ३८ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले.
आता नव्या सात उपसा सिंचन योजनांमुळे एक लाख ३४ हजार ७४६ हेक्टरला पाणी मिळणार आहे. जिल्ह्यात खरिपाचे क्षेत्र वाढले.
जिल्ह्यात आता सुमारे ४५ साखर कारखाने असून, बागायती क्षेत्र विशेषत: फळबागा वाढल्या. यामुळे शेतकऱ्यांना दारातही उभ्या न करणाऱ्या बॅंका दरवर्षी सुमारे पाच हजार कोटींचे कर्जवाटप करीत आहेत.
सिंचन योजना अन् पाण्याची तरतूद
योजना उजनीत तरतूद ओलिताखाली येणारे क्षेत्र
देगाव २ टीएमसी २२,००० हेक्टर
शिरापूर १.७३ टीएमसी १४,२०० हेक्टर
आष्टी १ टीएमसी १२,७८० हेक्टर
बार्शी २.५८ टीएमसी २१,३०० हेक्टर
सांगोला २ टीएमसी १३,०५५ हेक्टर
मंगळवेढा २.०३ टीएमसी १७,१८७ हेक्टर
एकरुख ३.१५ टीएमसी १०,२२४ हेक्टर
सोलापूर जिल्ह्यातील सिंचन वाढेल
सोलापूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमधील शेतकऱ्यांना उजनी धरणाचे पाणी मिळावे, अधिकाधिक क्षेत्र ओलिताखाली यावे, शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावे यासाठी जिल्ह्यात सात उपसा सिंचन योजनांची कामे सुरु आहेत.
काही योजना जून २०२६ पर्यंत पूर्ण होतील तर काही डिसेंबर २०२७ पर्यंत पूर्ण होतील. त्यातून सोलापूर जिल्ह्यातील आणखी एक लाखांहून अधिक हेक्टर शेतजमिनीला उजनीचे पाणी मिळेल.
- धीरज साळे, अधीक्षक अभियंता, भीमा कालवा मंडळ, सोलापूर
उजनीची सध्याची स्थिती
एकूण पाणीसाठा
१०७ टीएमसी
उपयुक्त पाणीसाठा
४३.४२ टीएमसी
पाण्याची टक्केवारी
८१ टक्के
ओलिताखालील क्षेत्राचा तालुकानिहाय अभ्यास
सोलापूर जिल्ह्यात ९० कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. ५६ लघू व सात मध्यम प्रकल्प आहेत. याशिवाय आता भीमा नदीवर उजनी धरण ते हिळ्ळी बंधाऱ्यापर्यंत
१५ आणि सीना नदीवर शिरापूर ते दक्षिण सोलापूर तालुक्याच्या हद्दीपर्यंत सहा बॅरेजेस उभारले जाणार आहेत. त्याचा सर्व्हे करण्याचा प्रस्ताव भीमा कालवा मंडळाकडे पाठविण्यात आला आहे.
दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण, टेंभू-म्हैसाळ योजना व नीरा नदी, यातून कोणकोणत्या तालुक्यातील
किती क्षेत्र ओलिताखाली आले व आणखी किती क्षेत्राला पाणी मिळू शकलेले नाही, याचाही अभ्यास झाला आहे.


0 Comments