सांगोला तालुक्यातील कडलास येथे लांडग्यांच्या हल्ल्यात १३ शेळ्यांचा मृत्यू; ८ शेळ्या पळविल्या
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला (प्रतिनिधी) : - तालुक्यातील कडलास येथे वन्य लांडग्यांच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याची घटना घडली आहे.
मुकुंद बाबासाहेब पाटील यांच्या शेतातील शेळीशेडवर शुक्रवार दि. १३ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री लांडग्यांनी हल्ला केला.
या हल्ल्यात १३ शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर ४ मोठ्या व ४ लहान अशा एकूण ८ शेळ्या लांडग्यांनी पळवून नेल्या. या घटनेत सुमारे चार लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
शेळीपालन हा पाटील कुटुंबाचा प्रमुख उदरनिर्वाहाचा
व्यवसाय असून, या घटनेमुळे कुटुंबावर आर्थिक संकट ओढवले आहे. घटनेनंतर शेतातील शेळीशेडचे मोठे नुकसान झाले असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच कृषी विभाग व वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. नुकसान भरपाई तातडीने देण्यात यावी
व भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, वन्य प्राण्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे परिसरातील शेतकरी धास्तावले असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे


0 Comments