भाजप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार; भाजप नेत्याने सांगितली आतली गोष्ट भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे
मुंबई : राज्यात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं वारं वाहू लागलं आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या घटक
पक्षांकडून निवडणुकीची तयारी देखील सुरू झाली आहे, मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून लढवल्या जाणार की?
स्वबळावर लढणार याबाबत आता मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. यावर आता मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.
‘महायुतीमध्येचं निवडणुका होतील पण ज्याठिकाणी जुळणार नाही त्याठिकाणी मैत्रिपूर्ण लढत होईल, त्यानंतर पुन्हा एकत्रित येऊ’ असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. महायुतीमध्येचं निवडणुका होतील पण ज्याठिकाणी जुळणार नाही
त्याठिकाणी मैत्रिपूर्ण लढत होईल, त्यानंतर पुन्हा एकत्रित येऊ, असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे, दरम्यान याचा अर्थ महायुतीमध्ये प्रॉब्लेम आहे, असा होत नाही, असंही त्यांनी यावेळी म्हटलं.
निवडणूक घेण्याचे अधिकार हे आयोगाला आहेत, आयोग जेव्हा निवडणूक घेईल तेव्हा सरकार म्हणून यंत्रणा तयार आहे.
भाजप म्हणून देखील आम्ही सक्षमपणे तयार आहोत. निवडणुकांमधून आम्ही काही गोष्टी शिकतो, लोकसभा निवडणुकीतून काही गोष्टी आम्ही शिकलो,
त्यानंतर चारच महिन्यांमध्ये विधानसभा निवडणूक आम्ही जिंकली, जिंकणे हरणे या लढाईत न जाता आम्ही जनतेचं काम करत आहोत, असं बावनकुळे यांनी यावेळी म्हटलं.
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी वाळू धोरणावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. वाळूमाफियांना रोखण्यासाठी नवीन वाळू धोरण आम्ही आणलं आहे.
अनेकजनांचे मंत्र्यांशी वगैरे संबंध असतात, वाळू संदर्भात तर काही जण अधिकाऱ्यांना थेट माझं देखील नाव सांगतात. पण माझा फोन जरी आला तरी चुकीच्या कामाला नाही म्हणा,
अशा सूचना मी अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. पुढच्या 3 वर्षांत वाळू माफिया आणि वाळू संदर्भातले सर्व महत्वाचे प्रश्न संपलेले असतील, असं यावेळी बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
0 Comments