सोलापूर जिल्ह्यातील घटना..तेरा वर्षाचा अल्पवयीन घरातून गेला पळून;'पालकही कंटाळले मुलाच्या वर्तनाला', मुलगा नेमकं काय करायचा..
मोबाईल गेमच्या दुष्टचक्रामध्ये अडकून घरातून पळून गेलेल्या तेरा वर्षाच्या अल्पवयीन शाळकरी मुलास अखेर बार्शी डेपोच्या वाहक व वैराग पोलिसांच्या मदतीने पालकांच्या ताब्यात देण्यात आले.
ही घटना गुरुवारी (ता. ८) साडेपाचच्या सुमारास बार्शी- सोलापूर बसमध्ये घडली. वैराग बस डेपोमध्ये मुलाला उतरवून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
वैराग बस स्थानकावर बार्शीहून सोलापूरकडे जाणाऱ्या बसमध्ये एक तेरावर्षीय शाळकरी मुलगा लपून बसला होता. एसटी बसचे वाहक सचिन दुबे यांना तो आढळून आला. त्यांनी त्या मुलाची चौकशी केली
असता तो बार्शी येथील रहिवासी असून, सातवीमध्ये शिकत असल्याचे त्यांना कळाले. वाहक दुबे यांनी मुलाला वैराग पोलिस ठाण्याचे पोलिस शिपाई सचिन मुंडे यांच्या मदतीने वैराग पोलिसांच्या ताब्यात दिले.
दरम्यान, ठाणे अंमलदार उमेश कंगले व पोलिस शिपाई श्रीमंत शिंगाडे यांनी मुलाला विश्वासात घेऊन त्याला बोलण्यात गुंग ठेवले. त्याने स्वत:चे नाव सांगून वाणी प्लॉट,
बार्शी येथे राहात असल्याचे सांगितले. मुलाने पोलिसांकडे व्हेज मंच्युरियन, खवा व भेळ खाण्याचा हट्ट केला आणि तो पोलिसांनी पुरविला.
त्या दरम्यान पोलिसांनी हा मुलगा सापडला असल्याची कल्पना त्याच्या पालकांना दिली. पालकाने वैराग पोलिस स्टेशन येथे सायंकाळी आठच्या सुमारास येऊन मुलास ताब्यात घेतले.
पालकही कंटाळले मुलाच्या या वर्तनाला
हा मुलगा मोबाईलवर जीटीए- ५ गेम खेळण्यामध्ये अधिक गुंतल्याचे लक्षात येते. यापूर्वी देखील तो बार्शी शहरामध्ये मोबाईलच्या आहारी जाऊन बऱ्याच वेळा घरातून पळून गेल्याचे मुलाच्या भावाने सांगितले. आई घरकाम तर वडील शेती करतात.
पालक त्याच्या अशा नेहमीच्या वर्तनाला कंटाळले असून, त्यांनी यापूर्वी मानसोपचार तज्ज्ञांचे उपचार देखील त्याला दिल्याचे सांगितले. मात्र त्याचा मुलावर परिणाम होत नसल्याचे मुलाच्या भावाने 'सकाळ'शी बोलताना सांगितले.
लहान मुलांमध्ये मोबाईल वापराचे व्यसन ही वाढती समस्या आहे. पालकांनी मुलांसोबत संवाद वाढवावा व त्यांना मोबाईलच्या बाहेरच्या गोष्टींत गुंतवावे. ठराविक वेळापुरतेच मोबाईल वापरास परवानगी द्यावी.
शिक्षण, खेळ आणि छंद यामध्ये मुलांची रुची वाढवावी. पालकांनी स्वतःही मोबाईलचा मर्यादित वापर करावा. दररोज कुटुंबासोबत वेळ घालवावा. सतत लक्ष ठेवून प्रेमाने मार्गदर्शन केल्यास ही सवय कमी करता येते.
- डॉ. संतोष बिनवडे, मानसोपचारतज्ज्ञ, बार्शी
0 Comments