सांगोला तालुका पाणी टंचाईच्या उंबरठ्यावर 221 हातपंप बंद ;
नदी नाले तलाव कोरडे ठणठणीत तर मागील आठ महिन्यापासून शिरभावी पाणीपुरवठा योजनाही बंद
सांगोला :तालुक्यातील 221 हातपंप बंद आहेत. तापमान वाढल्यामुळे पाण्याची पातळी खाली जात आहे. ज्यामुळे अनेक ठिकाणी हातपंप कोरडे पडत आहेत.
दरम्यान हंगामी 8 महिने सुरू असणारे हातपंप ही आता पाण्याअभावी कोरडे पडत आहेत.
तर 5 कोटी 21 लाख रुपये विद्युत विभागाची थकबाकी असल्याने मागील आठ महिन्यापासून शिरभावी पाणीपुरवठा योजना बंद आहे. तालुक्यातील नदी, नाले,
तलाव कोरडे ठणठणीत असून, उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने विहीर व बोअर च्या पाण्याच्या पातळ्याने तळ गाठला आहे.
यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार की काय अशी शक्यता वर्तवली जात आहे.
तालुक्याच्या ग्रामीण भागात 1 हजार 077 हातपंप आहेत. त्यापैकी 221 हातपंप पाण्याअभावी कायमस्वरूपी बंद आहेत. उर्वरित 856 हातपंप हंगामी सुरू राहतात.
परंतु उन्हाचा चटका जाणवू लागल्यामुळे भूजल पातळीत घट झाल्याने हे हातपंप हळूहळू बंद होण्याच्या मार्गावर आहेत.
उन्हाळ्यात सांगोल्यात पाण्याची पातळी खाली गेल्यामुळे काही ठिकाणी हातपंप बंद पडण्याची शक्यता असते.
या काळात पाण्यासाठी नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून ग्रामपंचायत किंवा संबंधित पाणी पुरवठा विभाग हातपंप तक्रारी प्राप्त होताच दुरुस्तीची कामे करत आहेत.
परंतु आता पाण्याच्या पातळीने तळ घातल्यामुळे हात पंप कोरडे पडत आहेत.
तालुक्यातील 82 गावाला पाणीपुरवठा करणारी शिरभावी पाणीपुरवठा योजना जुलै 2023 पासून म्हणजेच मागील आठ महिन्यापासून बंद आहे.
5 कोटी 21 लाख रुपये विद्युत विभागाची थकबाकी असल्याने पाणीपुरवठा करणाऱ्या विद्युत पंपाचा विद्युत पुरवठा खंडित आहे.
यावर वरिष्ठ पातळीवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे.
यासह पाणीपुरवठा करण्यासाठी तीन हातपंपाचे नूतनीकरण काम सुरू आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सदरची योजना सुरू करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत असल्याची माहिती आहे.
सांगोला तालुक्यातून जाणाऱ्या नदी, नाले, ओढे कोरडे ठणठणीत आहेत. सध्या उन्हाची तीव्रता वाढत असल्याने यामध्ये उन्हाचा पारा 40 अंश पर्यंत
पोहोचल्याने जमिनीतील पाण्याच्या पातळीमध्ये दिवसेंदिवस घट होत आहे. परिणामी गाव पातळीवर विहीर व विंधन विहिरीतील पाण्याची पातळीने तळ गाठला आहे.
प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या तरी पाणीटंचाई बाबत कोणताही अर्ज प्राप्त झालेला नाही परंतु येत्या काळात पाणीटंचाईचा गंभीर प्रश्न निर्माण होणार असल्याचे बोलले जात आहे.
सांगोला तालुक्यातील टंचाई आराखडा मा. जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला आहे. प्रशासनाकडून पाणीटंचाई संदर्भात बारकाईने लक्ष दिले जात आहे.
सध्या इटकी, लक्ष्मीनगर व राजापूर या गावातून पाणीटंचाईची परिस्थिती उद्भवण्याची शक्यता अधिक आहे.
परंतु सध्या त्या ठिकाणी सुरळीत पाणी पुरवठा सुरू आहे.
तसेच टंचाई संदर्भात तात्काळ अहवाल पंचायत समितीकडे सादर करण्याच्या सूचना ग्रामसेवक यांना दिले आहेत.
मा. उमेशचंद्र कुलकर्णी - गटविकास अधिकारी, सांगोला पंचायत समिती
0 Comments