सर्वात मोठी बातमी ! धनंजय मुंडे यांचा अखेर राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपवला राजीनामा, ‘पीए’ सागर बंगल्यावर
मुंबई : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी आज (4 मार्च) अखेर राजीनामा दिला आहे.
तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा स्वीकारला आहे. बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणात,
धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचा आरोप आहे. याच प्रकरणातून संतोष देशमुख यांची हत्या झाली होती. संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचे फोटो समोर आल्यानंतर, महाराष्ट्राभरातून संतापाची लाट उसळली होती.
अखेर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला. धनंजय मुंडे यांचे सहाय्यक प्रशांत भामरे आणि प्रशांत जोशी हे दोघे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर दाखल झाले होते.
अडीच महिन्यानंतर राजीनामा
9 डिसेंबर 2024 रोजी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. तेव्हाच विरोधकांनी ही अत्यंत क्रूर हत्या झाल्याचा आरोप केला होता. काल समाज माध्यमांवर सीआयडीच्या दोषारोपपत्रा सोबतचे फोटो समोर आले.
त्यानंतर राज्यात तीव्र प्रतिक्रिया समोर येत आहेत. विरोधकांनीच नाही तर सर्वसामान्य नागरिकांच्या सुद्धा अत्यंत जहाल प्रतिक्रिया समोर येत आहेत.
त्यानंतर आज सकाळपासूनच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू होती. धनंजय मुंडे यांना कालच राजीनामा दिल्याचा दावा करण्यात येत होता. तर आज सकाळपासून विरोधकांनी राजीनाम्याची मागणी लावून धरली होती.
पीएच्या मार्फत पाठवला राजीनामा
धनंजय मुंडे यांनी त्यांचा राजीनामा पीएच्या, स्वीय सहायकाच्या माध्यमातून सागर बंगल्यावर पाठवल्याची माहिती समोर येत आहे.
सकाळीच पीए हा राजीनामा घेऊन सागर बंगल्यावर पोहचले होते. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानभवनाकडे जाण्याची लगबग सुरू होती.
त्यावेळी हा राजीनामा त्यांच्यापर्यंत पोहचवण्यात आला आणि मुख्यमंत्र्यांनी हा राजीनामा स्वीकारल्याची माहिती समोर येत आहे. याविषयीची घोषणा विधानसभेत झाल्यावर त्यावर शिक्कामोर्तब होईल, असे विरोधक म्हणतात.
महायुतीचे दोन गुंडे
दरम्यान विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा यासाठी विरोधकांनी आंदोलन केले. त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे.
महायुतीचे दोनच गुंडे, कोकाटे आणि मुंडे अशा घोषणा त्यांनी केल्या. तर दुसरीकडे समाजवादी पार्टीचे अबू आझमी यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून सत्ताधारी पायऱ्यांवर आंदोलन करत आहेत.
0 Comments