खळबळजनक..विधानसभेमधील पराभव मविआतील मित्रपक्षांमुळेच, शेकापच्या जयंत पाटलांची खंत
लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये चांगले यश मिळाले. अशामध्ये विधानसभेत महायुतीला चांगलीच टक्कर दिली जाईल, अशी अपेक्षा होती.
मात्र, याउलट महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत 288 पैकी 50 जागाही मिळवता आल्या नाहीत.असे असताना महाविकास आघाडीमध्ये ठिणगी पडल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांचा सत्कार केल्यानंतर संजय राऊत यांनी केलेल्या विधानाने तर महाविकास आघाडीमध्ये फुट पडत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
यावर बोलताना शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमधील मित्रपक्षांनी दगा दिल्याने पराभव स्वीकारावा लागला.
शेकापचे नेते जयंत पाटील म्हणाले की, "निवडणुकीमध्ये आम्ही इंडि आघाडीत होतो. डाव्या पक्षांच्या मतांमुळे इंडि आघाडीचे महाराष्ट्रामध्ये 31 खासदार निवडून आले.
आम्ही यावेळी प्रामाणिकपणे काम केले होते. पण विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमधील घटक पक्षांनी आम्हाला मदत केली नाही.
मित्रपक्षांनी दगा दिला, त्यामुळे आमचा पराभव झाला," अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. अलिबागमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता संवाद मेळावा पार पडला. यावेळी त्यांनी इंडि आघाडीमधील पक्षांवर पराभवाचे खापर फोडले.
"विधानसभा निवडणुकीमध्ये डाव्या प्रागतिक पक्षांच्या आघाडीने महाविकास आघाडीकडे 20 जागांची मागणी केली.
पण, महाविकास आघाडीने आम्हाला एवढ्या जागा देण्यास नकार दिला. त्याच्या परिणामी काही मोजक्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती झाल्या. तर, दुसरीकडे जी जागा शेकापला देण्यात आल्या.
त्यामधील काही जागांवर मैत्रीपूर्ण लढती झाल्या. रायगडमधील बालेकिल्ल्यामध्ये शेकापला अपयशाला सामोरे जावे लागले. सांगोला ही एकच जागा शेकापला जिंकता आली." असे म्हणत जयंत पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.


0 Comments