ब्रेकिंग न्यूज ..आजारांना मिळतंय निमंत्रण भुयारी गटारीसाठी
सर्वत्र खोदाई कामामुळे प्रचंड धूळ आणि प्रदूषण सांगोलकरांचा श्वास गुदमरतोय
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला :- भुयारी गटारी योजनेचे काम पूर्णत्वाला घेऊन जाण्यासाठी शहरातील प्रमुख मार्गासह सर्वच भागांमध्ये खुदाई केली जात आहे.
यामुळे धुळीचे प्रमाण प्रचंड वाढले असून प्रदूषण ही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामध्ये रस्त्यावरील वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे सांगोलाकरांचा श्वास कोंडला जात असतानाच,
आजारांना निमंत्रण देणारी धूळ वातावरणात भरून राहिल्याने धोका प्रचंड वाढला आहे. यामुळे सांगोलकरांचा श्वास गुदमरतोय असे बोलले जात आहे.
यावर जाट ठिकाणी खोदाई काम झाले आहे त्या ठिकाणी नगरपालिकेने पाणी मारून धुळीचे प्रमाण कमी करावे अशी मागणी सांगोलकरांकडून केली जात आहे.
सांगोला शहरात व उपनगरात भुयारी गटारी योजनेच्या कामाला सुरुवात झाली आहे. ठिकठिकाणी गटारीचे काम प्रचंड वेगाने सुरू असून,
या कामासाठी सुरू असलेली खोदाई व यातून निघालेली माती याचे धुळीत रूपांतर होत आहे. दरम्यान रस्त्याच्या मध्यभागातून व बाजूने खोदाई सुरू असली तरी,
वाहनांमुळे प्रदूषणामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. रस्त्याच्या बाजूची झाडे देखील या धुळीने माखली असून, प्रचंड धुळीमुळे श्वसनाचे विकार वाढीस लागले आहेत.
मागील काही दिवसपासून सुरू असलेल्या खोदाई कामामुळे धुळीचे प्रदूषण आवाक्याबाहेर गेले आहे. हवेतील धुळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याने सर्दी, खोकल्यापासून दम्यापर्यंत
अनेक तक्रारी वाढल्या आहेत. ही धूळ आणखी दोन-तीन महिने तरी कमी होणार नसल्याने आगामी काळात दमा, ब्राँकॉयटिसच्या विकारांचा धोका निर्माण झाला आहे.
धुळीमुळे होत असलेल्या त्रासामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न वाढला आहे. दवाखान्यात रुग्णांचे प्रमाण वाढले आहे.
धूळ श्वासावाटे शरीरात जाते. धूलिकण फुफ्फुसात जमा होतात. अॅलर्जीचा त्रास असणा-यांना सर्दी, खोकला, कफ होणे, धाप लागणे असे त्रास होतात,
तर सर्वसामान्यांना सर्दी, खोकला आणि घशात दुखणे असे त्रास होत आहेत. संबंधित ठेकेदार यांच्याकडून खोदाई केलेल्या कामावरील जमा होणारी माती व कचरा बाजूला सारून आपले काम उरकून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे
परिणामी याचा परिणाम नागरिकांच्या जनजीवनावर होत असून, पालिका प्रशासनाने धुळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पाणी मारून घ्यावे आणि सांगोलकरांना धूळ आणि प्रदूषणापासून मुक्त करावे अशी मागणी जोर धरत आहे.
0 Comments