धक्कादायक.. ज्याला भाऊ म्हणत होती, तोच प्रियकर निघाला; दोन मुलींच्या आईचा गळा आवळून खून
विरारमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. विरारच्या फुलपाडा येथील एका 32 वर्षीय विवाहितेची
परिसरात राहणाऱ्या शेखरने गळा दाबून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. फुलपाडामध्ये राहणाऱ्या शेखरला या महिलेने आपला भाऊ मानलं होतं.
मात्र वारंवार शेखर घरी येऊ लागला आणि यातूनच भयंकर प्रकार घडला. धनश्री आंबडस्कर (32) असं हत्या
झालेल्या महिलेचे नाव असून आरोपी प्रियकर शेखर कदम याच्या विरोधात विरार पोलीस ठाण्यात कलम 302 नुसार हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी विरार पोलिसांनी आरोपी शेखर कदम याला पहाटे अटक केलं आहे. त्याला आज वसई न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
पती रुपेश आंबडस्कर याने दिलेल्या माहितीनुसार, धनश्री आणि रुपेश हे दाम्पत्य त्यांच्या 10 आणि 5 वर्षांच्या दोन मुली आणि मेहुणी
यांच्यासह विरारच्या फुलपाडा येथील घरात राहत होते. सोमवारी दुपारी 12.17 च्या सुमारास गोरेगाव येथील कंपनीत कामावर असताना रूपेशला पत्नी धनश्रीचा फोन आला.
यावेळी तिने त्याला तातडीने घरी येण्यास सांगितलं. मात्र रूपेशने काहीही न म्हणता फोन कट केला. सायंकाळी 5.24 च्या सुमारास रुपेशला त्याच्या शेजाऱ्यांचा फोन आला.
पत्नीची प्रकृती बिघडली असून तिला रूग्णालयात घेऊन जात असल्याचं शेजारच्यांनी सांगितलं. हे ऐकून रूपेशला धक्काच बसला. मात्र रुग्णालयात दाखल करताच तिचा रूग्णालयात मृत्यू झाला.
नक्की वाचा - कपाळावर टिकली, ओठांवर लिपस्टिक! विमानतळ अधिकाऱ्यानं महिलेच्या वेशात का केला आयुष्याचा शेवट?
वादातून केली हत्या...
शेखर ज्यावेळी धनश्रीच्या घरी आला तेव्हा तिचा पती रुपेश कामावर गेला होता.
शिवाय दोन्ही मुली शाळेत आणि रुपेशची मेव्हणी देखील कामावर गेली होती. त्यावेळी शेखर घरी आला. दोघांमध्ये कशावरून तरी वाद झाला.
वादानंतर प्रियकर शेखर कदम याने धनश्रीचा गळा दाबून तिची हत्या केल्याचा आरोप रुपेशने केला आहे. शेखर कदम हा देखील विवाहित असून तो देखील फुलपाडा परिसरात पत्नी आणि एका मुलीसह राहत होता.
याप्रकरणी विरार पोलीस आरोपी शेखर कदम याला पहाटे अटक करण्यात आली असून त्याला आज वसई न्यायालयात हजर केले
जाणार असल्याची माहिती विरार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय पवार यांनी दिली आहे.
0 Comments