खळबळजनक घटना! एका आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा गुदमरून झाला मृत्यू !
आज सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगर येथे आगीच्या घटना घडल्या असून, संभाजी नगर येथे लागलेल्या आगीत
एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाल्याची अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायी घटना घडली आहे.
उन्हाळ्याला सुरुवात झालेली असताना तपमानात मोठी वाढ होत आहे, अशातच आगीच्या घटना घडू लागल्या आहेत, परंतु छत्रपती संभाजी नगर येथे मात्र अत्यंत वाईट घटना घडली आहे.
आज पहाटेच्या सुमारास येथे एका कपड्याच्या दुकानाला आग लागली आणि एकाच कुटुंबातील सात जणांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे.
मृतदेह पाहून अनेकांना रडू कोसळले. छत्रपती संभाजीनगर येथेछावणी बाजारमधील महावीर जैन मंदिराच्या बाजूलाच हे कपड्याचे दुकान आहे.
या दुकानाला ही आग लागली, पहाटेच्या सुमारास आगीनंतर धुराचे प्रचंड लोट पसरले होते. खालच्या बाजूला लागलेल्या आगीचा धूर वरच्या मजल्यावर गेला आणि या धुरात गुदमरून ७ जण मृत्युमुखी पडले.
ही इमारत तेन मजल्यांची असून पहिल्या मजल्यावर सात जण होते, दुसऱ्या मजल्यावर सात जण आणि तिसऱ्या मजल्यावर दोघे जण होते, आग लागल्यानंतर पहिल्या मजल्यावरील सातही जण बाहेर पाडण्यात यशस्वी झाले
पण दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या सात जणांना, ही आग लागल्याची माहितीच मिळाली नाही. हे सगळे गाढ झोपेत होते, त्या सातही जणांचा गुदमरून मृत्यू झाला आहे.
सदरची आग नेमकी कशामुळे लागली हे लगेच निष्पन्न झाले नाही पण इलेक्ट्रिक स्कूटर चार्जिंगला लावली होती,
तेथे शॉर्ट सर्किटने आग लागली असल्याचे सांगण्यात येत आहे. या आगीत मृत्युमुखी पडलेल्यात दोन लहान मुले, दोन पुरुष आणि
तीन महिला यांचा समावेश आहे. आसिम वसीम शेख ( वय 3 वर्ष), परी वसीम शेख (वय 2 वर्ष), वसीम शेख (वय 30 वर्ष), तन्वीर वसीम (वय 23 वर्ष) हमीदा बेगम
(वय 50 वर्ष), शेख सोहेल (वय 35 वर्ष) आणि रेश्मा शेख ( वय22 वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. ही आग लागली तेंव्हा धुराचे लोट उसळलेच पण, स्फोटांचे आवाज देखील ऐकू येत राहिले.
या घटनेने परिसरात चिंता व्यक्त केली जात आहे तर मोठ्या प्रमाणात हळहळ देखील व्यक्त होऊ लागली आहे. ही सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.
दरम्यान सोलापूर येथेही अक्कलकोट रोडवर आज भीषण आग लागली. अक्कलकोट रस्त्यावर असलेल्या एमआयडीसीतील
अन्नपूर्णा टॉवेल कारखान्याला आज सकाळी भीषण आग लागली. ही आग कशामुळे लागली हे समजू शकले नसले तरी आगीचे स्वरूप अगदीच रौद्र आहे..
अग्निशामक यंत्रणा दाखल झाली आणि त्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला पण त्यानाही लवकर यश आले नाही. कारखान्यात टॉवेल व कच्चा माल असल्याने आगीचा भडका कायम असून परिसरात धुराचे लोट पसरले आहेत.
ही आग अधिक पसरणार नाही याची दक्षता अग्निशामक दलाकडून घेतली जात होती, आग लागल्यानंतर परिसरातील लोकांनीही येथे मोठी गर्दी केली.
0 Comments