मोठी बातमी.. पंचायत पुरस्कारासाठी सोलापूर जिल्ह्यातील चार गावांची राज्य पातळीवरून राष्ट्रीय पातळीवर शिफारस
गावाच्या शाश्वत विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी केंद्र शासनाने ९ संकल्पना निश्चित केल्या आहेत. या संकल्पनांतर्गत सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना केंद्र सरकारच्या पंचायत राज विभागाच्या वतीने राष्ट्रीय पंचायत पुरस्कार दिला जातो.
या पुरस्कारासाठी सोलापूर जिल्ह्यातील चार गावांची शिफारस महाराष्ट्र राज्यातून झाली आहे. राज्याने एकूण ११ गावांची शिफारस केली आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील चार गावांचा समावेश आहे.
अंकलगे (ता. अक्कलकोट) या गावाने सामाजिकदृष्ट्या सुरक्षित गाव या संकल्पनेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. यशवंतनगर (ता. माळशिरस) या गावाने स्वयंपूर्ण पायाभूत सुविधा या संकल्पनेत उत्कृष्ट काम केले आहे.
अर्धनारी (ता. मोहोळ) या गावाने बालस्नेही गाव या संकल्पनेत तर भोसे (ता. पंढरपूर) गावाने सुशासनयुक्त गाव या संकल्पनेत म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
या चारही गावांना राज्य पातळीवरील उत्कृष्ट पुरस्कार निश्चित झाला आहे. आता या चार गावांची शिफारस राज्य पातळीवरून राष्ट्रीय पातळीवर झाली आहे.
भारत सरकारच्या पंचायत राज विभागाने तयार केलेल्या तज्ज्ञ गटाने पंचायत राज संस्थांसाठी संकल्पनात्मक दृष्टिकोनाचा अंगीकार करण्याची सूचना केली होती. त्यानुसार नऊ संकल्पनांवर आधारित उत्कृष्ट काम करणाऱ्या गावांना हा पुरस्कार दिला जातो.
दि.24 एप्रिल रोजी पंचायत राज दिनानिमित्त दिल्ली येथे या चार गावातील सरपंच व ग्रामसेवक यांचा सन्मान केला जाणार आहे. ग्रामपंचायत विभागाची उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधिन शेळकंदे यांनी
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे प्रशिक्षण सत्र जिल्हा परिषदेत घेऊन त्यांच्याकडून योग्य ती पूर्व तयारी करून घेतली होती.केंद्राच्या पंचायतराज विभागाने सुचविलेल्या नऊही संकल्पनावर सोलापूर जिल्ह्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यात आली आहे.
गरीबी मुक्त आणि उपजीविका वृध्दीस पोषक गाव, आरोग्यदायी गाव, बालस्नेही गाव, जलसमृद्ध गाव,स्वच्छ व हरित गाव, स्वयंपूर्ण पायाभूत सुविधायुक्त गाव, सामाजिकदृष्ट्या सुरक्षित गाव, सुशासनयुक्त गाव,
लिंग समभाव पोषक गाव या नऊ संकल्पनांवर जिल्ह्यातील गावांनी चांगली कामगिरी केली आहे. त्यापैकी ४ संकल्पनांवर आधारित काम करणाऱ्या गावांची राष्ट्रीय पुरस्कारासाठी शिफारस झाली आहे.
या पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून 11 गावांची शिफारस झाली असून त्यापैकी चार गावे सोलापूर जिल्ह्यातील असल्याचा अभिमान आहे. – दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर


0 Comments