अवकाळी पावसाचा सोलापूर जिल्ह्याला जबर फटका;
104 गावात नुकसानीचे पंचनामे सुरू अक्कलकोट आणि पंढरपूर तालुक्यात फळबागा उध्वस्त
सोलापूर :(प्रतिनिधी) सोलापूर जिल्ह्याला अवकाळीचा व गरपीटीचा जबर फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील आठ तालुक्यातील 104 गावांना मोठा फटका बसला आहे.
या 104 गावातील सुमारे 3469 हेक्टरवरील शेती पिकांचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती जिल्हा कृषी अधिक्षक बाळासाहेब शिंदे यांनी दिली आहे. याबाबतचा अहवाल कृषी विभागाने शासनाला पाठविला आहे. बाधित शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार प्रत्यक्षात नुकसानीचे प्रमाण जास्त असल्याचे सांगितले जात आहे.
नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत, अशी मागणी आमदारांनी केली आहे.अक्कलकोट व पंढरपूर तालुक्यातील फळबागाना फटका - अक्कलकोट आणि पंढरपूर तालुक्यातील फळबागाना व शेतीपिकांना जास्त प्रमाणावर अवकाळी व गरपीटीचा फटका बसला आहे.
अक्कलकोट तालुक्यात ३८ गावांमध्ये ८१९ शेतकऱ्यांच्या ३२१ हेक्टर क्षेत्रात फळबागा व शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. यात पपई, द्राक्षे, आंबा यासह ज्वारी, गहू, हरभरा आदी पिकांचा समावेश आहे. तर पंढरपूर तालुक्यात सहा गावे बाधित झाली आहेत.
पंढरपूरात सुमारे २४०० शेतकऱ्यांच्या १८५० हेक्टर क्षेत्रात द्राक्षे, डाळिंब, पेरू, पपई आदी फळबागा मातीमोल ठरल्या आहेत.बार्शीतील तालुक्यातील द्राक्ष बागांचे नुकसान - बार्शी तालुक्यातील झाडी बोरगाव, तांबेवाडी या गावातील शेतकऱ्यांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये प्रामुख्यानं द्राक्ष पिकांना मोठा फटका बसला आहे.
द्राक्ष बाग पूर्णपणे तयार झाली होती. काही दिवसात पीक बाजारात येणार होते. मात्र,वादळी वारा आणि अवकाळी पावसानं हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. शासनाने लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.


0 Comments