सोलापूर - बार्शी मार्गावर अपघात, दोघांचा जागीच मृत्यू !
विवाह सोहळ्याला उपस्थित राहून परत आपल्या गावी निघालेल्या गाडीला अपघात होऊन दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. बार्शी - सोलापूर मार्गावर हा ट्रक आणि वॅगनर या दोन वाहनात धडक होऊन हा अपघात घडला.
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील एका गावातील विवाह सोहळासाठी सांगली जिल्हयातून रघुनाथ भगवान डोरले, अमित अशोक कोथळे आणि प्रताप शंकर देशमुख हे चार चाकी वाहनाने गेले होते.
बार्शी तालुक्यातील लग्न सोहळा उरकून हे तिघेही आपल्या गावी परत निघाले होते. मध्यरात्रीच्या नंतर हे तिघे वैरागजवळ असलेल्या शेळगाव परिसरात आले असता अपघात झाला.
धामणगावच्या दिशेने निघालेल्या एका ट्रकची आणि सांगलीकडे निघालेल्या चार चाकी वाहनांची जोरदार धडक झाली. ही धडक अत्यंत जोरात झाल्यामुळे चार चाकी वाहनातील रघुनाथ भगवान डोरले, अमित अशोक कोथळे हे दोघे जागीच ठार झाले तर प्रताप देशमुख हे गंभीर जखमी झाले आहेत.
जखमी देशमुख याना उपचारासाठी सोलापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विवाह सोहळा आटोपून ते रात्रीच परतीच्या प्रवासाला लागले होते आणि काही अंतर पुढे येताच काळाने त्यांना गाठले.
रात्रीचा प्रवास या दोघांच्या जीवावर बेतला असून चार चाकी गाडीच्या पुढील उजव्या बाजूने ट्रकने चार चाकी वाहनाला जोराची धडक दिली त्यामुळे गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाल्याने प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे.


0 Comments