सांगोल्यात आमदारांच्या कार्यक्रमात शेकापला डावलले
माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष दीपकआबा साळुंखे-पाटील म्हणाले की, आमदार शहाजीबापू यांचा मुंबईचा दौरा कधी मोकळ्या हाताने परत येत नाही. बापू आमदार झाल्यापासून तालुक्यातील पिण्याच्या पाण्याच्या योजना, शेतीच्या पाण्याच्या योजना, तालुक्यातील रस्ते व मूलभूत सुविधा करिता महाविकास आघाडी सरकारकडून भरघोस निधी खेचून आणला आहे.
सांगोला नगरपालिकेकडून सांगोला शहरात भुयारी गटार योजनेच्या कामाचा नुकताच शुभारंभ झाला. या कार्यक्रमासाठी शिवसेनेचे आमदार ॲड. शहाजीबापू पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस तसेच भाजपचे नेते उपस्थित होते. मात्र शेकापच्या नेत्यांना निमंत्रण न देता डावलण्यात आले. आनंदा माने गटालाही यापासून दूर ठेवण्यात आले.या दुजाभावावरून शेकापचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. आम्हाला जाणून बुजून डावलण्यात आल्याचा राग शेकापचे नेते तथा पुरोगामी युवक संघटनेचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
शहरातील भुयारी गटार योजनेच्या कामाचे सर्वेक्षण करण्याच्या कामाचा शहरातील वाढेगाव नाका येथील स्मशानभूमी पासून आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
यावेळी माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील, शिवसेनेचे नेते भाऊसाहेब रुपनर, भाजप तालुका अध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत, मुख्याधिकारी कैलास केंद्रे, बाबुराव गायकवाड, उदय घोंगडे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपअभियंता रविकांत ढावरे, शिवसेना शहरप्रमुख कमरुद्दीन खतीब, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तानाजी पाटील, दीपक खटकाळे, समीर पाटील, तोहिद मुल्ला, प्रा. संजय देशमुख, आनंद घोंगडे, अनिल खडतरे, शिवाजी बनकर, मधुकर बनसोडे, सोमनाथ लोखंडे, सोमेश यावलकर, पूजा पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सांगोल्यात भुयारी गटार योजनेच्या सर्व्हेक्षणाच्या कामाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. खरे तर सत्ताधारी आमदारांनी आम्हाला सांगणे जरुरीचे होते. नगरपालिकेनेही सांगितले नाही. नेमका कार्यक्रम कोणाचा होता हे आम्हाला समजू शकले नाही. केवळ जाणून बुजून आमच्या शेकाप पक्षातील कोणालाच सांगितले नाही. – डॉ. बाबासाहेब देशमुख
तर नावापुढे वडीलांचे नाव लावणार नाही
या कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना आमदार ॲड. शहाजीबापू पाटील म्हणाले की, विकासासाठी मी कधीही राजकारण करत नाही. यापुढेही शहर विकासासाठी सर्वांना बरोबर घेऊन विकास केला जाईल. परंतु आमच्या विचारसरणीच्या लोकांना संधी दिली तर पश्चिम महाराष्ट्रातील आदर्शवत ही सांगोल्याचे नगरपालिका केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. बारामतीसारखा या शहराचा विकास केला जाईल.
त्यामुळे यापुढे बारामतीकरही नगरपालिका पाहायला नाही आले तर मी नावापुढे वडिलांचे नाव लावणार नाही.नगरपालिकेच्या विविध कामांसाठी आतापर्यंत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून वीस कोटी रुपये मंजूर करून घेतले आहेत. शहराच्या विकासासाठी कोणत्याही प्रकारचा निधी मी कमी पडू देणार नाही. भुयारी गटार योजनेच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण करून हे काम लवकर चालू केले जाईल.
यापुढेही आमच्या विचारसरणीचा लोकांना सांगोला नगरपरिषदेमध्ये काम करण्याची संधी द्या पश्चिम महाराष्ट्रातील आदर्शवत नगरपालिका केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे आश्वासन आमदार शहाजी पाटील यांनी दिले.पुढे बोलताना आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले की, सांगोला शहरातील पाणीपुरवठ्याचे मोठे काम झाले असून वास्तविक पाहता पाणीपुरवठ्याचे काम झाल्यानंतर भुयारी गटाराचे काम होणे गरजेचे होते.
परंतु तसे झाले नाही. मी 2019 विधानसभा निवडणुकीमध्ये विजयी झाल्यापासून भुयारी गटार योजनेचा सातत्याने पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावला आहे. भुयारी गटारीचे काम चालू झाले की लगेच शहरातील रस्ते व लाईटचे काम जलदगतीने करून सांगोला शहराचा चेहरा-मोहरा बदलणार आहे असेही आमदार शहाजी पाटील यांनी सांगितले.अनेक प्रश्न मार्गी : दीपकआबा यावेळी माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष दीपकआबा साळुंखे-पाटील म्हणाले की, आमदार शहाजीबापू यांचा मुंबईचा दौरा कधी मोकळ्या हाताने परत येत नाही. बापू आमदार झाल्यापासून तालुक्यातील पिण्याच्या पाण्याच्या योजना, शेतीच्या पाण्याच्या योजना, तालुक्यातील रस्ते व मूलभूत सुविधा करिता महाविकास आघाडी सरकारकडून भरघोस निधी खेचून आणला आहे. सांगोला शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली जात आहेत.
0 Comments