टेंपो अपघातात सात जिवांचा करूण अंत !
बेगमपूर : सोलापूरच्या दिशेने जनावरे घेवून निघालेल्या टेंपोला अपघात होऊन सात म्हशींचा मृत्यू झाल्याची अत्यंत करुण घटना आज घडली आहे.
मोहोळ तालुक्यातील बेगमपूर गावाच्या जवळ भरधाव वेगातील टेंपो (एम एच १३ एएक्स २२३६) उलटून हा अपघात झाला. मंगळवेढ्याकडून सोलापूरच्या दिशेने निघालेला हा टेंपो जनावरे घेवून निघालेला होता. १९ म्हशी घेवून निघालेला हा टेंपो भरधाव वेगाने निघालेला असताना चालकाचा ताबा सुटला आणि त्यामुळे अनियंत्रित झालेला टेंपो बेगमपूरजवळ असलेल्या नेचर दूध डेअरीच्या समोरच्या बाजूस उलटला. टेंपोतील जनावरे रस्सीच्या सहाय्याने बांधण्यात आलेली होती. त्यामुळे टेंपो उलटल्यानंतरही या जनावरांना आपला जीव वाचवता आला नाही. जनावरांना घट्ट बांधण्यात आल्याने आणि टेंपो उलटल्याने रस्सीचा फास म्हशींच्या गळ्याला बसला आईन सात म्हशींचा यातच मृत्यू झाला. उर्वरित बारा जनावरे मात्र बचावली आहेत.
हा अपघात झाला तेंव्हा मोठा आवाज झाला आणि त्यामुळे आजूबाजूचे नागरिक घटनास्थळाकडे धावले. कामती पोलिसांना माहिती मिळाल्याने पोलीस देखील येथे दाखल झाले. अपघाताची अत्यंत भयावह आणि करुण परिस्थिती पाहून प्रत्येकाला धक्का बसत होता. पोलीस आणि नागरिकांनी तातडीने म्हशींना बांधलेल्या रस्सी कापून काढल्या दरम्यान ७ म्हशी मृतुमुखी पडल्या होत्या तर बारा म्हशींचा जीव वाचवता आला. गळ्यातील रस्सी कापताच या म्हशी सैरावैरा पळत सुटल्या. घाबरलेल्या म्हशी सैरभैर होऊन इकडे तिकडे पळत होत्या. दरम्यान पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने पळून गेलेल्या म्हशी पकडल्या आहेत.
लाखोंचे नुकसान !
वेगातील टेंपो अनियंत्रित होऊन उलटल्याने टेंपोचे जवळपास एक लाखांचे नुकसान झाले असून सात म्हशींचा प्राण गेल्याने अपघातात लाखोंचे नुकसान झाले आहे. मुक्या जिवांचा अशा प्रकारे करुण अंत झाल्याने प्रचंड हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. वाहनातील म्हशीना रस्सीच्या सहाय्याने घट्ट बांधल्यामुळे सात म्हशींचा मृत्यू झाला आहे.
अंत्यसंस्कार केले !
अपघातात मृत झालेल्या सात म्हशींवर गावाजवळ असलेल्या वनीकरण परिसरात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. सुदैवाने या अपघातातून बचावलेल्या बारा म्हशींना उत्तर सोलापूर तालुक्यातील कारंबा येथील गोशाळेत पाठविण्यात आले. ही करुण घटना पाहून अनेकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या.


0 Comments