उसाच्या बिलातून होणार आता कर्जाची वसुली !
सोलापूर : शेतकऱ्यांना आता हमीपत्रावर कर्ज देण्यात येणार असून सदर कर्ज उसाच्या बिलातून वसूल केले जाणार आहे. कर्ज घेण्यापूर्वी आधी वसुलीच्या संदर्भात हमीपत्र द्यावे लागणार आहे त्यामुळे कर्जाची वसुली सुलभ होणार आहे.
शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करून सोलापूर जिल्ह्यात उसाचे क्षेत्र वाढील जिल्हा मध्यावरी बँकेचे मोठे योगदान आहे. पिकांची लागवड करण्यापासून त्याचे जतन करण्यापर्यंत जिल्हा बँक शेतकरी बांधवाना कर्ज पुरवठा करीत असते. शेतकऱ्याच्या आर्थिक विकासात जिल्हा बँकेचे योगदान नेहमीच राहिले आहे पण शेतकरी कर्ज घेतात परंतु अनेक शेतकरी ते वेळेवर फेडत नाहीत त्यामुळे बँक अडचणीत येते. जिल्हा बँक अडचणीत आली आणि मागील काळात बँकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली. अलीकडे अनुत्पादित कर्जाची वसुली झाल्यामुळे बँकेची परिस्थिती सुधारत आहे. बँकेची गाडी रुळावर यावी म्हणून प्रशासकांनी शिक्षकांच्या व्यक्तिगत कर्जाची मर्यादा देखील वाढवली, सोने तारण कर्ज देण्यास सुरुवात केली परंतु शेतकऱ्याकडील कर्जाची अपेक्षित वसुली मात्र होत नाही.
जिल्हा बँकेच्या मदतीने जिल्ह्यात ऊसाचे क्षेत्र वाढलेले असून साखर कारखान्यानाही उसाची कमतरता जाणवत नाही. विकासाचे हे चक्र सुरु ठेवण्यासाठी शेतकरी बांधवाना दिलेले कर्ज वसूल होणे हे देखील तितकेच महत्वाचे आहे. साखर कारखान्यांनी त्यांच्याकडे ऊस दिलेल्या शेतकऱ्याकडे असलेले कर्ज वसुलीसाठी सहकार्य करणे हे बँकेला अपेक्षित आहे. जिल्ह्यातील काही साखर कारखाने याबाबत बँकेला चांगले सहकार्य करीत असून त्या तुलनेत अन्य काही कारखान्याकडून सहकार्य मिळत नसल्याचे दिसत आहे. कर्जाचे वाटप आणि वसुली करण्याची कार्यपध्दती दर्जेदार असायला हवी आणि घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्याची शेतकऱ्यांना सवय लागावी यासाठी साखर कारखान्यांनी वसुलीत मदत करणे बँकेला अपेक्षित आहे.
जिल्हा बँक शेतकऱ्यांना पिकांसाठी कर्ज देते परंतु परतफेडीची वेळ येते तेंव्हा वसुलीसाठी प्रतिसाद लाभत नाही. अनेकदा शेतकऱ्याचा ऊस कारखान्याला जातो परंतु बँकेचे कर्ज मात्र चुकते केले जात नाही. त्यामुळे बँकेने आपल्या कर्ज वाटप धोरणात मोठा बदल केला असून कर्जाचे वेळीच एक हमीपत्र देणे शेतकऱ्याला बंधनकारक करण्यात आले आहे. कोणत्याही कारखान्यास ऊस दिलेला असला तरी त्या उसाच्या बिलातून कर्जाची रक्कम वसूल करण्यास कसलीही हरकत नाही अशी हमी देणारे हे हमीपत्र असून कर्ज वाटपावेळीच शेतकऱ्यांना तसे लिहून द्यावे लागणार आहे. या हमीपत्राच्या आधारे साखर कारखाने देखील विनासायास वसुली करू शकतील आणि बँक देखल अडचणीत येणार नाही.


0 Comments