आजपासून महावितरण करणार चुकीच्या बिलांची दुरुस्ती !
सोलापूर: शेतीसाठी वापरण्यात आलेल्या विजेच्या चुकीच्या बिलांची दुरुस्ती करण्यासाठी महावितरणने आजपासून तालुका स्तरावर शिबिरे घेण्यात येणार असून ग्राहकांनी बिले दुरुस्त करून घ्यावीत असे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यात विजेचे बिल न भरलेल्या ग्राहकांचा विद्युत पुरवठा तोडण्याची मोहीमच महावितरणने हाती घेतली आहे पण चुकीच्या बिलाच्या असंख्य तक्रारी शेतकरी करीत आहेत. जादाची बिले देण्यात आली असून काही ठिकाणी तर विजेचे कनेक्शन जोडले नसतानाही अशा ग्राहकांना बिले आली आहेत. शिवाय कमी हॉर्स पॉवरचे पंप असताना जादा हॉर्स पॉवर दाखवून बिले देण्यात आली आहेत आणि दुरुस्ती करून मागितली तर आधी बिले भर मग दुरुस्ती करू हे महावितरणचे नेहमीचे पालुपद सुरु असते त्यामुळे शेतकरी आणि अन्य ग्राहकांचीही कोंडी होत आहे. यात तोडगा निघत नसल्याने अनेक शेतकऱ्यांची बिले भरायची राहिली आहेत. अशा शेतकऱ्यांचा देखील वीज पुरवठा तोडण्यात येत आहे त्यामुळे असंतोष निर्माण झालेला आहे.
शेतकऱ्यांच्या विजेच्या बिलाच्या दुरुस्तीचा प्रश्न त्वरित सोडविण्यात येईल आणि ही बिले तपासून दुरुस्तीच्या (Incorrect electricity bills) सूचना देण्यात येतील अशी ग्वाही नुकतीच उर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली होती आणि लगेच तालुक्याच्या ठिकाणी शिबीर घेवून ही बिले दुरुस्ती करण्याची कार्यवाही सुरु झाली आहे. आज १० मार्चपासून सुरु होणारी ही शिबिरे ३१ मार्च पर्यंत सुरु राहणार आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी शिबिरातून विजेची बिले दुरुस्त केली जाणार आहेत. मंजूर वीजभार, मीटर रीडिंग, थकबाकी या संदर्भातील सर्व तक्रारींचा विचार या शिबिरात करण्यात येणार आहे. कृषी पंपाच्या वीज देयकाची दुरुस्ती तसेच मंजुरीचे प्रस्ताव संगणकीय प्रणालीद्वारे मंजूर करून बिलांच्या दुरुस्तीनंतर थकबाकीची सुधारित रक्कम शेतकरी ग्राहकास त्वरित कळवली जाणार आहे.
बिलांची पडताळणी आणि दुरुस्ती केली जाणार असून आजपासून तालुका स्तरावर होत असलेल्या या दुरुस्ती शिबिरात कृषी वर्गवारीतील ग्राहकांनी आपली बिले दुरुस्त करून घ्यावीत असे आवाहन देखील महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.

0 Comments