शिवजयंती उत्सव साजरा करताय ? राज्य सरकारची नियमावली जाहीर
येत्या 19 फेब्रुवारीला पार पडणाऱ्या शिवयजयंती सोहळ्यावर कोरोनाचं सावट आहे. मागील दोन वर्ष मोठ्या कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली होती. यंदा तिसऱ्या लाटेचं सावट आहे. मात्र कोरोनाचा दाह कमी होत असल्याने राज्य सरकारने शिवजयंती उत्सव सार्वजनिक पद्धतीने साजरा करण्यासाठी मोठा निर्णय जाहीर केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या 'शिवज्योत दौड'मध्ये 200 आणि जन्मोत्सव सोहळ्यासाठी 500 जणांना उपस्थित राहता येतील, अशी घोषणा राज्य सरकारच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदत्भआतील गृह विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मान्यता दिली.
मात्र, आरोग्य नियमांचे पालन करून सर्वांच्या आरोग्याची आणि स्वच्छतेची काळजी घेत शिवछत्रपतींचा जन्मोत्सव सोहळा साजरा करावा, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
येत्या शनिवारी (दि. १९) छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. त्या अनुषंगाने गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी शिवज्योत आणि जन्मोत्सव सोहळ्यातील उपस्थितीबाबत विशेष बाब म्हणून अनुमती देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर केला होता. त्यावर मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी ही मान्यता दिली आहे.
तसे निर्देशही गृह विभागासह संबंधित यंत्रणांना देण्यात येत आहेत. शिवजयंती उत्सवासाठी विविध शिव प्रेरणास्थळांवरून शिवज्योती वाहून आणण्यात येतात. त्यासाठी या 'शिवज्योजी दौड'मध्ये दोनशे जणांना सहभागी होता येईल. तसेच शिव जन्मोत्सव सोहळ्यात पाचशे जण उपस्थितीत राहू शकणार आहेत.

0 Comments