राज्यातील 7800 शिक्षक बोगस, शिक्षण विभागात मोठी खळबळ
राज्यात शिक्षक व्हायचे असेल, तर शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण असणे आवश्यक असते.. राज्य परीक्षा परिषदेमार्फत ही परीक्षा घेण्यात येते. आतापर्यंत राज्य परीक्षा परिषदेने सात वेळा टीईटी परीक्षा घेतली आहे. शिक्षक होण्यासाठी ही परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक असल्याने त्यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाले आहेत.
त्यामुळे ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या प्रमाणपत्राची चौकशी करण्यात यावी, तसेच त्यातील दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून नव्याने परीक्षा घेण्याची मागणी होत होती.
विशेषत: मागील दोन-तीन वर्षांत उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेऊन त्यांना उत्तीर्ण करण्यात आल्याचे समोर आले आहे. हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर त्याची कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीतून राज्यातले तब्बल 7800 शिक्षक बोगस असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
टीईटीमध्ये अपात्र ठरलेल्या तब्बल 7800 उमेदवारांना पैसे घेऊन पास केल्याचे उघड झालंय. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने 2019-20 मध्ये घेतलेल्या टीईटी परीक्षेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला आहे. तसेच 2018 मध्येही या परीक्षेत मोठ्या प्रमाणात अपात्र ठरलेल्या उमेदवारांकडून पैसे घेऊन त्यांना पात्र ठरविण्यात आल्याचे समोर आले आहे.
राज्य परीक्षा परिषदेकडून आलेला मूळ निकाल आणि प्रत्यक्ष जाहीर केलेला निकालाची पडताळणी सायबर पोलिसांनी केली. त्यात हा गैरप्रकार समोर आला आहे. टीईटी परीक्षेत उत्तीर्ण करण्यासाठी काही अधिकाऱ्यांनी उमेदवारांकडून 50 ते 60 हजार रुपये घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

0 Comments