बापरे! सहा कोटींचा वाळूचा ठेका 21कोटींला गेला ; मंगळवेढ्यातील बांधकामांना मिळणार मुबलक वाळू
तीन वर्षांनंतर अखेर सोलापूर जिल्ह्यातील वाळू लिलावा मुहूर्त मिळाला आहे. ९ पैकी ४ ठिकाणांवरील ६२ हजार ९२२ ब्रास वाळू लिलावातून महसूल प्रशासनाला ६९ कोटी ३३ लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे.
ठेकेदाराने सरासरी ११ हजार रुपये ब्रासने वाळू लिलाव घेतले आहेत. पाच ठिकाणी एकाही ठेकेदाराने बोली लावली नाही. या लिलाव प्रक्रियेमुळे आता शहर जिल्ह्यातील बांधकामांस मुबलक वाळू उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
विशेष म्हणजे नवीन वाळू उपसा धोरणानुसार तीन वर्षांसाठी हे ठेके देण्यात आले आहेत. दर वर्षानंतर ६ टक्के अधिक महसूल देऊन वाळू उपसा करण्यात येणार आहे.
मोहोळ तालुक्यातील अर्धनारी येथील १५७८० ब्रासचा साठा ११ कोटी ९० लाखांस गेला. त्याची शासकीय किंमत ६.९० कोटी होती.
मोहोळ तालुक्यातील अर्धनारी-बठाण मंगळवेढा साठा क्रमांक १ येथील ठेका १५ हजार ८४८ ब्रासचा होता. तो २१.३३ कोटी रुपयास गेला आहे. त्याची शासकीय किंमत ६.९ कोटी होती.
अर्धनारी-बठाण साठा क्रमांक २ येथील ठेका १५ हजार ७६८ ब्रासचा होता, तो २१ कोटी ३० लाख रुपयास गेला, त्याची शासकीय किंमत ६.९ ० कोटी होती.
अर्धनारी बठाण साठा क्रमांक ३ हा १५ हजार ५२६ ब्रासचा होता, तो १४ कोटी ८० लाख रुपयास गेला. त्याची शासकीय किंमत ६.८० कोटी होती.(स्रोत; दिव्य मराठी)
जिल्ह्यात राष्ट्रीय हरित लवाद, उच्च न्यायालय, कोरोना व इतर कारणांमुळे लिलाव होऊ शकले नाहीत. यंदाही ९ पैकी फक्त ४ ठिकाणी ठेकेदारांचा प्रतिसाद मिळाला.
घोडेश्वर तामदरडी येथील साठा क्रमांक १ ते ३ , मिरी तांडोर , मिरी सिद्धापूर या पाच ठिकाणी एकाही ठेकेदारांनी बोली लावली नाही.
चार ठिकाणचे लिलाव झाल्याने आता पुढील तीन वर्षे जिल्ह्यातील शासकीय कामांसोबतच बांधकामांना मोठ्या प्रमाणात वाळू उपलब्ध होणार आहे
तीन वर्षांनंतर वाळू लिलाव झाल्याने ठेक्यासाठी स्पर्धा वाढली आहे. दोन ठेक्यासाठी शासकीय किमतीच्या दुप्पट तर तीन ठेक्यासाठी तिप्पट रक्कम मिळाली.
अर्धनारी- बठाण येथील साठा क्रमांक एकला सर्वाधिक किंमत मिळाली. ६.९ ३ कोटी किंमत असताना २१.३३ कोटी रुपये मिळाले. त्याखालोखाल साठा क्रमांक २ साठी ६.९ ० कोटी किंमत असताना २१.३० कोटी रुपये मिळाले आहेत.
इतर दोन्ही ठिकाणी दुप्पट रक्कम मिळाली आहे. लिलाव प्रक्रिया पूर्ण झाली असून, सोमवारनंतर पैसे भरून घेणे व ताबा देण्याची प्रक्रिया होईल असे अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव म्हणाले.
0 Comments