महिला सरपंच असलेल्या गावात पतीदेव होतायेत लुडबुड पांडे..
गावामध्ये महिला सरपंच असताना अनेक ठिकाणी पतिराज किंवा नातेवाईक कामात हस्तक्षेप करीत लुडबुड करतात.महिलांचा सहभाग हा राजकारणात जास्तीत जास्त असावा तसेच त्यांना त्यांचे हक्क आणि अधिकार हे सुरुवातीच्या काळात ग्रामीण व्यवस्थेत मुख्य असलेल्या ग्रामपंचायत स्तरावरुन मिळावे म्हणून सरपंच पदाचे व सदस्य पदाचे आरक्षणात महिलांना समान हिस्सा कायद्याच्या माध्यमातून देण्यात आला. महिलांना राजकारणातील आरक्षण व समान हिस्सा देणे यामागील मुख्य उद्देश हाच होता की महिलांना राजकारणाच्या पटलावरती मुख्य प्रवाहामध्ये आणून त्यांचे अधिकार त्यांना प्रधान करणे. परंतु या मुख्य उद्देशालाच इंदापूर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीमध्ये हरताळ फासण्यात येत आहे.अनेक ग्रामपंचायतीमध्ये महिला सरपंच आहेत परंतु या महिलांना स्वतःच्या मनाने गावच्या विकासाची कोणतीही ध्येय,धोरणे व निर्णय घेऊ दिला जात नसून त्या सर्व महिला सरपंचांचे पतीदेव ग्रामपंचायत मध्ये हस्तक्षेप करून रुबाब दाखवत आहेत.तसेच ग्रामपंचायतीमध्ये महिला सरपंचाचे नातेवाईक व पतीदेव हे गावांतील नागरिकांना व ग्रामपंचायत सदस्यांना ग्रामपंचायत मध्ये येऊन अपमानित करत असल्याचे दृश्य पाहावयास मिळत आहे.ग्रामपंचायतीच्या मासिक मीटिंग साठी महिला सरपंच व महिला सदस्य यांची उपस्थिती अनिवार्य असते. तरीही त्यांच्या शिवाय त्यांचे पतीदेव बैठका आटोपून घेत आहेत. एवढेच नव्हे तर त्यांच्यावतीने सह्या ही करताना दिसत आहेत.नागरिकांना सरपंचांचे दाखले हवे असल्यास त्या दाखल्यावरती सह्यासुद्धा पतीदेव मंडळीच करत आहेत.महिला सरपंचांच्या कामामध्ये लुडबुड करणार्या सरपंच म्हणून मिरवणाऱ्या त्या महिला सरपंचांच्या पती वर व नातेवाईकांवरती मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील कलम ३९ (१) अन्वये कारवाई केल्या शिवाय त्यांना अद्दल घडणार नाही अशी बहुतेक ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे.


0 Comments