google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 अकरावीची बुधवारपासून प्रवेश प्रक्रिया! कॉलेज स्तरावर तीन गुणवत्ता याद्या

Breaking News

अकरावीची बुधवारपासून प्रवेश प्रक्रिया! कॉलेज स्तरावर तीन गुणवत्ता याद्या

 अकरावीची बुधवारपासून प्रवेश प्रक्रिया! कॉलेज स्तरावर तीन गुणवत्ता याद्या


सोलापूर : अकरावीची प्रवेश प्रक्रिया आता महाविद्यालय स्तरावर मेरीट लिस्टनुसार राबविली जाणार आहे. बुधवारपासून (ता. 18) प्रवेश अर्ज विक्रीस प्रारंभ होत असून, प्रवेश अर्जासाठी विद्यार्थ्यांना 125 रुपये मोजावे लागतील.

 शहर - जिल्ह्यात अकरावी प्रवेशाच्या एकूण 76 हजार 736 जागा आहेत. प्रवेशासाठी तीन गुणवत्ता याद्या प्रसिद्ध होणार आहेत. जिल्ह्यात अकरावी विज्ञान शाखेची 198 महाविद्यालये असून कला व वाणिज्य शाखेची 326 महाविद्यालये आहेत. यंदा निकालाची टक्‍केवारी वाढली आहे. दरवर्षी एटीकेटी (एक - दोन विषयात अनुत्तीर्ण विद्यार्थी) विद्यार्थ्यांसह कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांचा कल कला शाखेकडे असतो.

 मात्र, यंदा जवळपास 60 टक्के विद्यार्थ्यांनी 75 टक्‍क्‍यांहून अधिक गुण घेतल्याने त्या विद्यार्थ्यांचा कल आता विज्ञान, वाणिज्य शाखेसह आयटीआय, बी-फार्मसी, डिप्लोमा इन इंजिनिअरिंगकडे वाढला आहे. या पार्श्‍वभूमीवर कला महाविद्यालये ओस पडण्याची भीती कला शिक्षकांना वाटू लागली आहे. विद्यार्थी संख्या कमी झाल्यास तुकड्या बंद पडतील आणि आपण अर्धवेळ तथा अतिरिक्‍त होऊ, याचीही चिंता त्यांना सतावू लागली आहे. दुसरीकडे, जिल्ह्यात आणखी काही महाविद्यालये प्रस्तावित असून त्यांनाही मान्यता मिळेल. अनेक महाविद्यालयांनी क्रॉप सायन्ससह अन्य अभ्यासक्रमांसाठी परवानगी मागितली आहे. त्यामुळे कला महाविद्यालयांमधील शिक्षकांवर अतिरिक्‍त होण्याची टांगती तलवार कायम आहे.

 दरम्यान, अकरावी प्रवेशाला पुढील आठवड्यात सुरवात होणार असून 20 सप्टेंबरनंतर अध्यापनाला सुरवात करण्याचे शालेय शिक्षण विभागाचे नियोजन आहे."सीईटी' रद्द झाल्यामुळे आता अकरावीचे प्रवेश महाविद्यालय स्तरावर होतील. परंतु, मेरीट लिस्टनुसारच संपूर्ण प्रक्रिया राबविली जाईल. पुढील आठवड्यात प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असून सर्वांनाच त्यांच्या आवडत्या शाखेला प्रवेश मिळेल. भास्कर बाबर, माध्यमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

Post a Comment

0 Comments