google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोमवारपासून महाराष्ट्र होणार अनलॉक ; पाच स्तरांवर होणार अंमलबजावणी वडेट्टीवार यांच्या घोषणेनंतर काल रात्री उशिरा सरकारकडून नियमावली जाहीर

Breaking News

सोमवारपासून महाराष्ट्र होणार अनलॉक ; पाच स्तरांवर होणार अंमलबजावणी वडेट्टीवार यांच्या घोषणेनंतर काल रात्री उशिरा सरकारकडून नियमावली जाहीर

 मुंबई /  राज्यातील कोरोना लॉकडाऊन अंतर्गतचे निर्बंध शिथिल करणारी नवीन नियमावली राज्य शासनाने शुक्रवारी मध्यरात्री जाहीर केली असून ती सोमवार , ७ जूनपासून लागू होणार आहे .


मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी याबाबतचा आदेश काढला . ३ जून रोजी संपलेल्या आठवड्याच्या सरासरीनुसार भरलेल्या ऑक्सिजन बेडचे प्रमाण आणि पॉझिटिव्हीटी दर या आधारे प्रत्येक जिल्हा प्रशासन नियमावली संदर्भात स्वतंत्र आदेश काढतील , पण या दोन निकषांच्या आधारे नियमावली कशी असेल हे राज्य शासनाने निश्चित केले आहे . प्रत्येक आठवड्यात या दोन निकषांवर जिल्ह्यांची वर्गवारी करून नियमावलीनुसार निर्बंध शिथिल वा कडक केले जाणार आहेत . एकूण पाच स्तर निश्चित करण्यात आले आहेत .मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी अनलॉक संदर्भात घोषणा केली होती . पण त्यानंतर काहीच तासात राज्य शासनाने खुलासा करून कोणतीही नियमावली अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही असे स्पष्ट केले होते . त्यामुळे सरकारी गोंधळ समोर आला होता . मात्र , अखेर शुक्रवारी मध्यरात्री नियमावली जारी करण्यात आली . पाच टक्क्यांपेक्षा कमी कोरोना पॉझिटिव्हीटी दर आहे आणि जिथे २५ टक्क्यांपेक्षा कमी ऑक्सिजन बेड भरलेले आहेत तेथील सर्व व्यवहार खुले करण्यात येतील . हा पहिला स्तर मानला जाईल . पाच टक्क्यांपेक्षा कमी पॉझिटिव्हीटी दर आहे आणि २५ ते ४० टक्के ऑक्सिजन बेड भरलेले आहेत ते दुसऱ्या स्तरात मोडतील . पाच ते दहा टक्के पॉझिटिव्हीटी रेट असेल आणि ४० टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड भरलेले असतील , असा तिसरा स्तर मानला जाईल . तेथील व्यवहार सायंकाळी ५ वाजता बंद होतील .दहा ते वीस टक्के पॉझिटीव्हीटी दर असेल आणि ६० टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड भरलेले असतील असा चौथा स्तर मानला जाईल आणि तेथे सायंकाळी ५ नंतर व्यवहार बंद होतील आणि शनिवार , रविवारी व्यवहार बंद असतील . २० टक्यांपेक्षा अधिक पॉझिटिव्हीटी रेट असेल आणि ७५ टक्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड भरलेले असतील , तो पाचवा स्तर असेल . पहिल्या स्तरात मोडणाऱ्या ठिकाणी मॉल , दुकाने , सिनेमा हॉल आणि सभागृहांच्या वेळेचे बंधन नसेल . तसेच लग्न सोहळे व सार्वजनिक कार्यक्रम , सार्वजनिक वाहतूक देखील पुर्ण क्षमतेने सुरू होईल . दुसऱ्या स्तरातील ठिकाणी मॉल आणि सिनेमा हॉलमध्ये ५० टक्केच उपस्थितीची अट राहील . तिसऱ्या स्तराच्या ठिकाणी दुकाने दुपारी ४ पर्यंत सुरू राहतील . सिनेमागृहे , सभागृहे , नाट्यगृहे बंद राहतील . चौथ्या स्तरात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने दुपारी ४ पर्यंत सुरू राहतील आणि अन्य दुकाने बंद राहतील . पाचव्या स्तरातील ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने दुपारी ४ पर्यंतच सुरू राहतील . शनिवार , रविवारी बंद असतील .



Post a Comment

0 Comments