Breaking News

"घरच्या माणसांवर रागावणे हा आमचा अधिकारच"


सांगोला (सोलापूर) : शरद पवार हे आमच्यासाठी मार्गदर्शकच असून महाविकास आघाडी सरकारच्या कुटुंबातील प्रमुख नेते आहेत.


सांगोला  सारख्या दुष्काळी भागासाठी सिंचन योजना प्रलंबित असताना इंदापूरसाठी उजनीतील पाणी   नेणे योग्य नसल्याने मी तालुक्याच्या हक्काच्या पाण्यासाठीच पवार साहेबांवर टिका केली होती. मी राजकीय दृष्टिकोनातून टिका केली नसून घरातील माणसांवर रागावणे, टिका करणे हा आमचा अधिकारच असल्याचे सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.

इंदापूर तालुक्यातील 22 गावांसाठी उजनीतून पाच टीएमसी पाण्याच्या निर्णयास स्थगिती मिळताच आमदार पाटील यांनी नरमाईची भूमिका घेतल्याचे दिसून आले. उजनी धरणाच्या पाण्यावरून गेले काही दिवसांपासून सोलापूरचे वातावरण चांगलेच तापले होते. यातच शिवसेनेचे सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी थेट शरद पवारांवर टीकास्त्र सोडत उजनीचे पाणी इंदापूरला नेल्यास सोलापूर जिल्ह्यात रक्तरंजित आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला होता. तसेच राज्यात ज्या ज्या वेळी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली व त्यांच्या विचाराचे सरकार आले तेव्हा त्यांनी फक्त बारामतीचा विकास केलेला आहे. बारामतीला सगळा निधी मिळवून द्यायचा आणि बारामती हे विकास मॉडेल आहे, असे देशभर सांगायचे ही पवारांची राजकीय पद्धत आहे, अशीही टीका आमदार शहाजीबापू पाटील यांनी केली होती.

शरद पवारांवर केलेल्या टिकेमुळे जिल्ह्यासह राज्यात शहाजीबापू पाटील यांची चर्चा सुरू होती. मुख्यमंत्र्याच्या पक्षातीलच एका आमदाराने शरद पवारांवर टिका केल्यामुळे विरोधकांच्याही भुवया उंचावल्या होत्या. परंतु इंदापूरसाठी उजनीतून जाणाऱ्या पाण्याचा आदेश जलसंपदा विभागाने रद्द करताच शहाजीबापू पाटील यांनी नरमाईची भूमिका घेतली. गेल्या अनेक वर्षापासून दोन टीएमसी पाण्यासाठी सांगोल्याची जनता तहानलेली असताना येथील अनेक प्रश्न प्रलंबित असताना  दुष्काळी सांगोल्यातील पाणीप्रश्नावर लक्ष देणे गरजेचे होते.

शरद पवार खासदार असतानाच त्यांनी या प्रलंबित योजनांना प्राधान्याने निधी उपलब्ध करुन योजना पूर्ण करणे महत्त्वाचे होते. परंतु उजनीचे पाणी इंदापूरला नेल्यामुळे तालुक्याच्या हक्काच्या पाण्यासाठी मी शरद पवारांवर टीका केली होती. सांगोल्याच्या हक्काच्या पाण्यासाठी मी अशी भूमिका घेतली होती. परंतु पवार साहेब हे महाविकास आघाडीचे प्रमुख असल्याने आमच्यावर झालेल्या अन्यायासाठी टीका-टिप्पणी करणे हा माझा अधिकारच आहे. राज्यातील प्रमुख नेत्यांनी सर्वसमावेशक राजकारण करण्याची गरज असल्याचेही शेवटी आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.

दुष्काळी सांगोला तालुक्याच्या हक्काचे पाणी मिळवणे व प्रलंबित पाणी योजना पूर्ण करणे माझा मुख्य हेतू आहे. कोणावर टिकाटिपणी करून राजकीय लाभ घेण्याचा माझा कोणताही हेतू नसून तालुक्याला प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी निधी मिळवणे हाच माझा मुख्य हेतू आहे.

शहाजीबापू पाटील, आमदार, सांगोला विधानसभा.

Post a Comment

0 Comments