जळगाव, 30 जानेवारी : आजच्या काळात माणुसकी दाखवणारे लोक कमीच सापडतात. मात्र या लोकांनी माणुसकी दाखवल्यावर त्याची परतफेड चांगलीच असेल हेसुद्धा सांगता येत नाही. असाच एक प्रकार जळगाव जिल्ह्यामध्ये घडला आहे.
जळगाव जिल्ह्यात नशिराबाद इथे दारोदार फिरत दोन महिला तूप विकत होत्या. या महिलांनी एका घरी आपण थकलो असून काही खायला मिळेल का अशी विचारणा केली. एका घरी जोडप्याला दया आली आणि त्यांनी या महिलांना घरात बोलवलं. बसून अगदी प्रेमानं पोटभर जेवू घातलं. मात्र या महिलांनी कृतघ्नपणा दाखवत भयंकर काम केलं.
या दोन महिलांनी डोळ्यांच्या साहाय्यानं या जोडप्याला चक्क संमोहित केलं. हे केल्यावर त्यांनी घरात मोठी चोरी केली. एकूण 30 हजार रुपये रोख आणि सोन्याचे दागिने घेऊन त्या चलाखपणे पसार झाल्या. एकूण 1 लाख 99 हजार 821 इतक्या रुपयांचा ऐवज या दोघींनी लुटला. अजूनच विशेष बाब ही, की हे दाम्पत्य या महिलांना हायवेपर्यंत सोडूनही आले.
या प्रकरणात शनिवारी पोलिसात (police) गुन्हा दाखल करण्यात आला.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुरुषोत्तम बारसू तेली हे साठीतले गृहस्थ पत्नी शकुंतला हिच्यासह नशिराबादमध्ये ग्रामपंचायत कार्यालयाजवळ राहतात. त्यांच्या घरी दोन महिला गुरुवारी 28 तारखेला तूप विकायला आल्या. ‘आमचं तूप शुद्ध असून 200 रुपये किलो आहे.’ असं सांगत त्या तूप घेण्याचा आग्रह करत होत्या. आधी त्यांनी प्यायला पाणी मागितलं. मग जेवायला देण्याची विनंती करत दाम्पत्यानं होकार दिल्यावर त्या घरात आल्या. जेवताना आपल्या डोळ्यांनी या दोघींनी दाम्पत्याला संमोहित केलं. प्रत्येकी पाच ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, अजून एक साडेतीन तोळा सोन्याची अंगठी, दोन सोन्याच्या वेली असे मिळून 10 ग्राम दागिने आणि तीस हजार रुपये रोख त्यांनी लुटले.
या दोन्ही महिलांना सोडून घरी आल्यावर दाम्पत्याला आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. तोवर या महिला मात्र फरार झालेल्या होत्या.
0 Comments