घरांची पडझड झालेल्या कुटुंबाना तातडीने मदत द्यावी - चेतनसिंह केदार-सावंत !
अतिवृष्टीमुळे तालुक्यात झालेल्या नुकसानीची केली पाहणी
सांगोला (तालुका प्रतिनिधी): अतिवृष्टीमुळे घरांची पडझड झालेल्या कुटूंबाना महसूल विभागाने तातडीने मदत द्यावी. तसेच नुकसान झालेल्या शेतीचे फळबागा, घरे, विहिरी, जनावरे यांचे सरसकट पंचनामे करून तातडीने मदत द्यावी अशी मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी केली.
भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी सोमवारी नुकसानग्रस्त सांगोला तालुक्यातील डिकसळ, पारे गावांचा दौरा करत थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. एकही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहू नये यासाठी सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी प्रशासनाला दिल्या. डिकसळ ते आवंढी रोडवरील इंगोले-पवार वस्तीवरील नागरिकांना ये-जा करण्यासाठी रस्ताच नसल्याने नागरिकांचा प्रवास खडतर झाला आहे. या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांच्या अडचणीची प्रशासनाने दखल घेऊन तातडीने रस्ता तयार करून द्यावा असे तहसीलदार योगेश खरमाटे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून मागणी केली.
पावसाने घर पडल्याने उत्तम गायकवाड यांच्या शेळ्या मरण पावल्या आहेत. चेतनसिह केदार सावंत यांनी गायकवाड यांच्या घरास भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. तसेच अधिकाऱ्यांशी फोनवरून संपर्क साधून गायकवाड कुटूंबाना आपत्कालीन निधीतून तातडीने मदत देण्याच्या सूचना केल्या. चेतनसिह केदार सावंत यांनी या परिसरातील पावसाने नुकसान झालेल्या बाजरी, मका, सूर्यफूल, उडीद, ज्वारी, डाळींब बागांची पाहणी केली. हातातोंडाशी आलेली पिके वाया गेली आहेत. शेतकऱ्यांच्या शेतातील मातीही पाण्याने वाहून गेली आहे. पावसाने अनेक घरांची पडझड झाली आहे. अनेक जनावरे मरण पावली आहेत. पाहणी दरम्यान त्यांनी संबंधित महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना ज्या पद्धतीने फळबागांचे नुकसान झाले, त्यांच्या नोंदी व्यवस्थित घेण्यात याव्यात अशा सूचना दिल्या. यावेळी डिकसळ गावचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अशोक करताडे, नाना हालगंडे, पोलीस पाटील अनिल कुलकर्णी, संजय पाटील, विलास निळे, साहेबराव इंगोले, विठ्ठल पवार, बाळासाहेब गायकवाड, शिवाजी भंडारे यांच्यासह असंख्य शेतकरी उपस्थित होते.



0 Comments