महूदकरांचा संताप: विजयनगर–पुणे राष्ट्रीय महामार्गाचे काम महूद मुख्य चौकात; वाहतूक कोंडीने नागरिक हैराण
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
महूद : महूद येथून जाणाऱ्या विजयनगर–पुणे राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या सांगोल्याकडून पुढे सरकत महूदच्या मुख्य चौकात पोहोचले असून, यामुळे शहरात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
आधीच अरुंद रस्ते आणि त्यात महामार्गाच्या कामामुळे निर्माण झालेली खोदाई, अडथळे आणि अवजड यंत्रसामग्री यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत.
महामार्गाचे काम नियमांनुसार व योग्य रुंदीने सुरू आहे का, याबाबत स्थानिकांमध्ये शंका व्यक्त केली जात आहे. मात्र या तांत्रिक मुद्द्यांपेक्षा सध्या सर्वात मोठी समस्या म्हणजे
वाहतुकीची कोंडी. मुख्य चौकातच काम सुरू असल्याने चारही दिशांनी येणारी वाहने अडकून पडत आहेत. विशेषतः सकाळ-संध्याकाळच्या वेळी परिस्थिती अधिक गंभीर बनते.
सध्या दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थ्यांना वेळेवर परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.
अनेक पालकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. “पेपरच्या दिवशी १०-१५ मिनिटांची उशीरही विद्यार्थ्यांसाठी धोकादायक ठरू शकतो,” अशी भावना पालकांनी व्यक्त केली.
तसेच अत्यवस्थ रुग्णांना रुग्णालयात पोहोचवताना अडथळे निर्माण होत असल्याच्या तक्रारीही समोर येत आहेत. रुग्णवाहिका कोंडीत अडकून पडल्याच्या घटना घडल्याचे नागरिक सांगतात. आपत्कालीन परिस्थितीत ही कोंडी जीवघेणी ठरू शकते, अशी भीती व्यक्त होत आहे.
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, मुख्य चौकात काम सुरू करण्यापूर्वी अवजड वाहतूक पर्यायी मार्गाने वळवणे आवश्यक होते. तात्पुरते बायपास मार्ग, स्पष्ट दिशादर्शक फलक आणि वाहतूक पोलिसांची नियुक्ती केली असती तर परिस्थिती इतकी बिकट झाली नसती.
महूदकरांचा सरळ सवाल आहे — “रस्ता देता का? आणि देत असाल, तर नियोजनासह द्या!”
प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी तातडीने हस्तक्षेप करून अवजड वाहतूक वळवावी, वाहतूक सुरळीत करावी आणि कामाची पारदर्शक माहिती जाहीर करावी, अशी मागणी जोर धरत आहे.


0 Comments