महाराष्ट्राचा आधारच गेला . अशा अवघ्या महाराष्ट्राच्या लाडक्या अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली !
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगोला तालुकाध्यक्ष मा.अतुल मालक पवार वतीने भावपूर्ण श्रद्धांजली..
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
महाराष्ट्राचा दादा अजितदादा पवार नावातच नव्हे तर कामाच्या बाबतीतही बाप माणूस असणारे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक दमदार व्यक्तीमत्व आज आपल्यातुन निघून गेले ! राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगोला तालुकाध्यक्ष मा. अतुल मालक पवार
वेळेच्या बाबतीत अत्यंत काटेकोर असणारे अजितदादा अवघ्या महाराष्ट्राला वेळेच्या आधीच पोरकं करुन सोडून गेले .
घड्याळाची अचूक वेळ आज चुकली .
अजितदादा हे स्पष्टवक्ते, प्रशासनावर वचक असणारे, दिलेला शब्द पाळणारे महाराष्ट्रातील एकमेव नेते होते . सुरवातीच्या काळात शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना पवार साहेबांचे पुतणे एवढीच ओळख असणाऱ्या अजितदादांनी नंतरच्या काळात राजकारणात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती .
अजितदादांकडे एखादं काम घेऊन गेल्यानंतर ते काम होत असेल तरच हो म्हणायचे नसल्यास स्पष्टपणे नाही म्हणून सांगण्याच्या स्वभावामुळे अजितदादा जनमाणसात ओळखले जायचे .
राजकारणात अशी माणसं दुर्मिळच. दादांच्या फटकळ स्वभावामुळे लोकांमध्ये त्यांच्याविषयी आदरयुक्त भिती होती परंतु त्यामध्ये सुध्दा एक प्रकारचा सच्चेपणा असल्यानं लोकांचं त्यांच्यावर असलेलं प्रेम कमी न होता वाढतच गेलं होतं .
एखादं काम होत नसेल तर अजितदादा त्यांच्या स्टाईलने अधिकाऱ्याला खडसावून सांगायचे .
जलसंपदामंत्री असताना उजनी धरणाची उंची वाढवण्याचा अतिशय महत्वाचा निर्णय अजितदादांनी त्यांच्या काळात घेतला होता . उर्जामंत्री असताना महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात ठिकठिकाणी सबस्टेशन मंजुर केली.
राजकारणात काम करत असताना स्वतःचा मतदारसंघ कसा असावा हे बारामती शहराला देशाच्या नकाशावर विकसित शहर बनवून दादांनी सिद्ध करुन दाखवले . अजितदादांची स्वच्छतेविषयी असणारी तळमळ बारामती शहरात ते भल्या पहाटे फिरताना दिसुन यायची . अजितदादा वृक्षप्रेमी होते .
हरित बारामती करण्याचं काम दादांनी केलं . उत्तम आणि दर्जेदार कामे झाली पाहिजेत याकडे अजितदादांचा कटाक्ष असायचा .
उपमुख्यमंत्री म्हणून काम करत असताना अनेक लोकहिताचे निर्णय त्यांनी घेतले. मागच्या काही वर्षापूर्वीचे अजितदादा आणि आत्ताचे अजितदादा यांच्यामध्ये अमूलाग्र बदल झाल्याचे जाणवायचे . लोकप्रिय असलेलं हे नेतृत्व अधिकाधिक लोकाभिमुख होत चाललं होतं . महाराष्ट्रभर फिरत असताना प्रत्येक मतदार संघातील मूलभूत प्रश्न काय आहेत, तिथल्या अडचणी काय आहेत हे अजितदादा जाणून घ्यायचे .
सरकारमध्ये सर्वाधिक काळ उपमुख्यमंत्री म्हणून काम करणाऱ्या अजितदादांना येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून पाहण्याची महत्वाकांक्षा सर्वसामान्य जनता जनार्दनाची होती ती अपूर्णच राहिली .
अजितदादांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्राचे कधीही भरुन निघणार नाही असे नुकसान झाले आहे .
महाराष्ट्राचा आधारच गेला . अशा अवघ्या महाराष्ट्राच्या लाडक्या अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली ! राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगोला तालुकाध्यक्ष मा.अतुल मालक पवार वतीने भावपूर्ण श्रद्धांजली..



0 Comments