'आई स्वप्नात आली अन् म्हणाली...', 16 वर्षीय मुलाच्या Suicide Note नं सोलापूर हादरलं; 'मामा तुला एक...'
जुळे सोलापूर येथे एका 16 वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आईच्या मृत्यूच्या नैराश्यातून या मुलाने टोकाचे पाऊल उचलत गळफास घेऊन मामाच्या घरी आत्महत्या केली.
शिवशरण भुताळी तळकोटी असे आत्महत्या केलेल्या मुलाचं नाव आहे. तो अकरावीत शिकत होता. तीन महिन्यांपूर्वी शिवशरणच्या आईचं कावीळ झाल्याने निधन झाल्यापासूनच तो खचला होता.
शिवशरणला आईच्या मृत्यूमुळे मोठा धक्का बसला होता. शिवशरणने मृत्यूपूर्वी आपल्या व्यथा चिठ्ठीच्या माध्यमातून व्यक्त केल्या. या चिठ्ठीत त्याने आई माझ्या स्वप्नात आली होती असं म्हटलं आहे.
...म्हणून मामाकडे राहत होता
शिवशरणला दहावीमध्ये 92 टक्के गुण मिळाले होते. 'नीट'चा अभ्यास करून त्याला डॉक्टर व्हायचे होते. कावीळ आजारामुळे आईचं तीन महिन्यापूर्वी दुःखद निधन झालं. त्यानंतर शिवशरण मानसिकदृष्ट्या खचला होता.
वडील एका खाजगी संस्थेत कमी मानधनावर काम करत होते. त्यामुळेच शिवशरणला त्याचा मामा महादेव तोळनुरे यांनी कोंढवा येथून सोलापुरात कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीसाठी प्रवेश घेतला होता.
मात्र आईच्या निधनामुळे त्याला मोठा मानसिक धक्का बसला होता. मामा आणि आजीकडे बघून शिवशरणने जगण्याचा प्रयत्न केला असा आत्महत्येपूर्वीच्या चिठ्ठीत त्याने म्हटलं आहे.
आत्महत्येपूर्वीच्या चिठ्ठीत म्हणाला, आई स्वप्नात आली अन्...
मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत शिवशरणने आई स्वप्नात आल्याचा उल्लेख केला आहे. ''मी शिवशरण. मी मरत आहे कारण मला जगण्याची इच्छा नाही. माझी आई गेली तेव्हाच मी जायला पाहिजे होते
पण मी मामा व आजीचे तोंड बघून जिवंत होतो. माझ्या मरण्याचे कारण म्हणजे आई काल स्वप्नात आली होती. ''तू जास्त तणावात का आहेस ?
माझ्याकडे ये...'' असे म्हणून तिने मला बोलावले. त्यामुळे मी मरण्याचा विचार केला. मी मामाचे व आजीचे खूप आभार मानतो, कारण त्यांनी मला खूप सपोर्ट केला. माझे लाड पुरवले," असं शिवशरणने चिठ्ठीत लिहिलं आहे.
"मामा... मी मरत आहे. मी गेल्यावर माझ्या बहिणीला सुखात ठेव. मी कुठेही नाही जाणार. परत येणार आहे, वाट पाहा. मामा, मला तुला एक सांगायचं आहे.
आजीला पप्पाकडे पाठवू नको. सगळ्यांनी आपापली काळजी घ्या. तू मला आईबाबांपेक्षा जास्त केलंस, त्याबद्दल धन्यवाद. तुमचा पिंट्या'' असा उल्लेख शिवशरणने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत आहे.
मृत्यूला मीच जबाबदार
"माझ्या मृत्यूला मीच जबाबदार आहे," असंही चिठ्ठीच्या शेवटी कंसात शिवशरणने लिहून ठेवलं आहे. या प्रकरणामध्ये सोलापूर शहरातील पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
0 Comments