महाराष्ट्राला हादरवणारी बातमी ! गर्भपात करताना महिलेचा मृत्यू, मृतदेहासह २ मुलांना इंद्रायणी नदीत जिवंत फेकले
अनैतिक संबंधातून राहिलेला गर्भ पात करण्याच्या प्रयत्नात महिलेचा मृत्यू झाला. महिलेच्या मृतदेहाची विल्हेवाट
मावळातील इंद्रायणी नदीत करताना महिलेच्या दोन लहान मुलांनी आरडा ओरड केली.तेव्हा त्या मुलांना ही पाण्यात जिवंत फेकून दिले.
याप्रकरणी आरोपीला आंबी एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतलंय. याशिवाय आरोपीच्या एका साथीदाराच्याही मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, महिलेची हत्या ६ जुलै ते ९ जुलै दरम्यान घडली. या प्रकरणी २२ जुलै रोजी महिलेच्या नातेवाईकांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल झाला आहे.
गजेंद्र दगडखैर याचे आणि महिलेचे अनैतिक संबंध होते. महिला गर्भवती राहिल्यानंतर तिचा गर्भपात करण्यासाठी रुग्णालयात नेलं होतं.
मात्र गर्भपातावेळी तिचा मृत्यू झाल्यानं आरोपींनी तिचा मृतदेह नदीत फेकला. तेव्हा तिच्या दोन लहान मुलांनाही नराधमांनी नदीत फेकून दिलं.
अनैतिक संबंधातून २५ वर्षीय महिला गर्भवती राहिल्याचं समजताच तिचा गर्भपात करण्यासाठी रुग्णालयात दाखल केलं.
गर्भपातावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाला.
डॉक्टरांनीही ही बाब लपवून ठेवली आणि तिचा मृतदेह रविकांत भानुदास गायकवाड व एका महिलेच्या ताब्यात दिला.
त्यानंतर गजेंद्र जगन्नाथ दगडखैर आणि रविकांत यांनी महिलेच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने तो नदीत फेकून दिला.
निर्दयीपणाचा कळस
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळं प्रेयसीचा 8 जुलैला मृत्यू झाला. मग गर्भपात करून देणाऱ्या एजंट महिलेने मध्यस्थी करत
मृतदेह गजेंद्रचा मित्र रविकांत गाईकवाडच्या सोबतीनं मावळमध्ये आणला. मग गजेंद्र आणि रविकांतने 9 जुलैच्या
अंधारात इंद्रायणी नदीच्या वाहत्या प्रवाहात मृतदेह फेकून दिला. नंतर प्रेयसीची दोन्ही मुलं रडू लागली. आता या दोघांमुळं आपलं बिंग फुटेल, या भीतीने निर्दयीपणाचा कळस गाठला.
कोणतीही दया-मया न दाखवता त्या दोन्ही मुलांना ही त्याच नदीच्या प्रवाहात जिवंत फेकून दिलं. दुसऱ्या दिवसांपासून हे दोघे ही काही घडलंच नाही, असं वावरू लागले.
संपर्क होत नसल्यानं कुटुंबियांची तक्रार, अन झाला उलगडा
प्रेयसीसोबत तिच्या कुटुंबीयांचा संपर्क होत नसल्यानं, तिच्या कुटुंबीयांनी तळेगाव एमआयडीसी पोलिसांत तिघे हरवल्याची तक्रार दिली.
मग पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली. प्रेयसीला गजेंद्रने अनेकदा फोनवरून संपर्क साधल्याचं आणि गजेंद्रने मित्र रविकांतशी त्याच दरम्यान
फोनवर अनेकदा बोलल्याचं तपासात समोर आलं. या दोघांची पोलिसांनी अनेकदा कसून चौकशी केली, मात्र दोघे ही उडवाउडवीची उत्तरे देत होती.
शेवटी पोलिसी खाक्या दाखवण्यात आला अन दोघांनी घडला प्रकार कबूल केला. तळेगाव पोलिसांनी या दोघांना बेड्या ठोकल्या असून पुढील कारवाई सुरू आहे.
0 Comments