खळबळजनक..‘जे होतंय ते ह्या म्हातारी मुळेच होतंय हिला जिवंत ठेवत नाही,’ असे म्हणून अंगावर गाडी घालून आजे-सासूचा खून
खटाव तालुक्यातील दरूज येथे बायको आणि बाळाला तिच्या माहेरचे नातेवाईक पाठवत नाहीत, या रागातून आजेसासूच्या अंगावर गाडी घातल्याने जखमी झालेल्या
आजेसासूचा सोमवारी, दि.१३ रोजी सांगली येथे मृत्यू झाला. याप्रकरणी नातजावयाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शालन शंकर आवळे (वय ५३) असे आजेसासूचे नाव असून सागर उमापे नातजावई आहे.
या घटनेबाबत सीमा विठ्ठल लोखंडे यांनी पुसेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार खुनाच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुसेगाव पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार सीमा विठ्ठल लोखंडे यांच्या घरासमोरील रस्त्यावर त्यांचा जावई सागर संपत उमापे (मुळ रा. राजाचे कुर्ले, ता. खटाव, सध्या रा. गंगापूर
शिवनगर,आनंद कॉलनी, नाशिक) याने पत्नी आणि बाळाला सासरचे मंडळी पाठवत नाहीत, या कारणावरून चिडून घरातील लोकांशी भांडण केले.
तसेच पत्नीची आजी शालन शंकर आवळे यांच्याकडे रागात बघून ‘जे होतंय ते ह्या म्हातारी मुळेच होतंय
हिला जिवंत ठेवत नाही,’ असे म्हणून त्याच्या ताब्यातील कार (एमएच ४७ एन १९३३) सुरु करून गाडी पाठीमागे घेऊन पुन्हा गाडी जोरात पुढे घेऊन तिचे अंगावर घातली.
यात शालन आवळे गंभीर जखमी झाल्या. गंभीर जखमी शालन आवळे यांना तातडीने सांगली येथे उपचारासाठी नेण्यात आले. यादरम्यान सांगली येथील रुग्णालयात सोमवारी त्यांचा मृत्यू झाला.
त्यानंतर खुनाच्या घटनेची नोंद पुसेगाव पोलिस ठाण्यामध्ये करण्यात आली. सहायक पोलिस निरीक्षक आशिष कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
0 Comments