मोठी बातमी...उजनी जलाशयात बुडालेल्या सहा जणांचे मृतदेह सापडले
इंदापूर: राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाला उजनी धरणाच्या जलाशयामध्ये मंगळवारी बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत बुडालेल्या सहा जणांना शोधण्यात आज सकाळी यश आले.
मात्र दुर्दैवाने सर्व सहाजणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. आज दुर्घटनेच्या तिसऱ्या दिवशी सकाळपासून बुडालेल्या व्यक्तींचा शोध घेण्याची मोहीम सुरू करण्यात आली होती.
ज्या ठिकाणी बोट बुडाली होती त्या परिसरात आज सकाळी एका पाठोपाठ एक असे पाच मृतदेह आढळून आले. त्यानंतर सहावा मृतदेह सापडला.
सहा जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.आज सकाळी तिसऱ्या दिवशीही उजनी जलाशयाच्या दोन्ही काठावर बुडालेल्या व्यक्तींचे नातेवाईक व ग्रामस्थ बसून होते.
आज राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या जवानांना या व्यक्ती आढळून आल्या मात्र त्या मृतावस्थेत. त्यानंतर उजनीकाठ नातेवाईकांच्या आक्रोशाने पुन्हा दाटून आला.
काल दुपारी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकाला जलाशयात बोटीचा शोध लागला होता. मात्र पाण्यात बुडालेल्या कोणाचाही शोध लागला नव्हता.
बोटीत असलेली एक मोटरसायकल सापडली होती. आज सकाळपासूनच राष्ट्रीय आपत्ती दलाचे वीस जवान पुन्हा तीन बोटींद्वारे शोध घेत होते. काही मच्छीमारांच्या होडीही त्यांच्या मदतीला होत्या.
काही स्थानिक बोटीही या मोहिमेत सहभागी झाल्या. छत्तीस तासांच्या अथक परिश्रमानंतर आज बोट दुर्घटनेत सापडलेल्यांचा शोध लागला. मात्र ते मृतावस्थेत आढळून आले.
दरम्यान त्यांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी करमाळा ग्रामीण रुग्णालयात पाठवले असून त्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत.
या दुर्घटनेतील गोकुळ दत्तात्रय जाधव (वय ३०), कोमल गोकुळ जाधव ( वय २५), माही गोकुळ जाधव (वय ३), शुभम गोकुळ जाधव (वय दिड वर्ष,सर्व रा. झरे ता. करमाळा)
अनुराग ज्ञानदेव अवघडे (वय २६), गौरव धनंजय डोंगरे (वय २४ रा. कुगाव ता. करमाळा) यांचा शोध लागला असून सहाही जण मृत्युमुखी पडले आहेत.
0 Comments