बाबो..! निवडून आलो की तरुणांची लग्न लावणार; सोलापूरच्या ‘या’ उमेदवाराची अजब घोषणा; आश्वासनाची तुफान चर्चा
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांनी निवडणूक येण्यासाठी चांगलीच कंबर कसली आहे. कुणी वाघ पकडायची अट ठेवतंय तर कुणी दारुची दुकानं सुरू करू म्हणत आहे.
आता चक्क एका उमेदवारानं निवडून आल्यास तरुणांची लग्न लावून देऊ असं आश्वासन दिलं आहे. त्याच्या या आश्वासनाची सध्या तुफान चर्चा होत आहे.
राज्यात दुष्काळ, बेरोजगारी, महागाई, हमीभाव, अवकाळी पाऊस या सारखे कळीचे आणि महत्त्वाचे अनेक प्रश्न समोर असताना वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने मात्र या सर्व प्रश्नाना बगल देत,
थेट तरूणांची लग्न करणं हा माझ्या समोरचा महत्त्वाचा प्रश्न आहे असं म्हटलं आहे. अनेक चांगल्या तरुणांना आज मुली मिळत नाहीत मी निवडून आलो तर तरुणांची लग्न करुन देईन असं आश्वासन त्याने दिलं आहे.
तरुणांची लग्न होत नाही आणि तो प्रश्न सोडवण्याचा मी प्रयत्न करणार असल्याची अफलातून घोषणा उमेदवारानं केली आहे. त्यांच्या या घोषणेची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.
वंचित बहुजन आघाडीकडून रमेश बारस्कर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ते आज पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी आले होते. यावेळी
त्यांनी माध्यमांशी बोलताना मतदार संघातील लग्नाळू तरूणांच्या समस्येवर भाष्य केले.माढा लोकसभा मतदारसंघा सह राज्यभरातील तरूणांची वेळेवर लग्न होत नाही. त्यांची ही आजही मोठी समस्या आहे.
35- 40 वर्षे उलटून गेली तरी तरूणांची लग्न होतं नाहीत. त्यांच्या लग्नाची ही समस्या सोडविण्यासाठी आपण प्राधान्याने काम करणार असल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले.
अलीकडेच त्यांनी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर लग्नाळू तरूणांचा मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता.
त्या नंतर आता थेट त्यांनी निवडणूक प्रचारातील प्रमुख मुद्दा बनवला आहे. त्यांच्या या घोषणेची मतदार संघात चर्चा सुरू झाली आहे.
0 Comments