ब्रेकिंग न्यूज..आता सुट्टी नाही! मराठा समाजास आरक्षण मिळेपर्यत लढा सुरू ठेवणार;
मनोज जरांगे पाटील यांची ग्वाही; मंगळवेढ्यातील सभेला प्रचंड गर्दी
मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय अंतिम टप्प्यात आला आहे.
समाजातील सर्व लोकांनी एकत्र येऊन मराठा आरक्षणाचा लढा लढला पाहिजे. कित्येक वर्षापासून हा आरक्षणाचा प्रश्न शासन दरबारी आहे.
आता कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत लढा सुरुच राहिल, असे प्रतिपादन मनोज जरांगे-पाटील यांनी येथे केले.
मंगळवेढा येथे सकल मराठा समाजाच्या वतीने गुरुवारी आयोजीत जाहीर सभेत ते बोलत होते.
प्रारंभी संत दामाजी चौकात मनोज जरांगे-पाटील यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.
जरांगे पाटील पुढे बोलताना म्हणाले की, मराठा समाजात अनेक गोरगरीब लोक आहेत. सरकारने आता आरक्षणाचा प्रश्न सोडवावा.
समाजात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी मराठा समाजातील प्रत्येक व्यक्तीने जागरुक राहिले पाहिजे.
आरक्षणाचा प्रश्न हा समाजातील प्रत्येक व्यक्तीचा आहे. समाजात दुफळी निर्माण होणार नाही. यासाठी समाजातील प्रत्येकांनी लक्ष द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
'मराठा आरक्षणासाठी सर्वांनी एकत्रित यावं'
सर्व पक्षांना विनंती करतो, सगळे एक व्हा , मराठ्यांना तसेच मराठा समाजाला आरक्षण द्या. मी कोणत्या नेत्यासोबत चर्चा केली,
कुणी काय आश्वासन दिलं, हे माझ्या लक्षात राहत नाही. रात्रीतून मंत्री बदलतात. यांचे मतभेद जुळत नसताना जुळवून घेतात.
त्यामुळे आपल्यातील मतभेद दूर ठेवा, असं आवाहन देखील मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला केलं आहे.
मंगळवेढ्यातील सभेला प्रचंड गर्दी
आज झालेल्या मंगळवेढ्यातील सभेला पंढरपूर, सांगोला येथील मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
'आंदोलनात फुटपाडण्यासाठी सरकार डाव आखू शकतं'
दरम्यान, मराठा आंदोलनात फुट पाडण्यासाठी सरकार एखादा डाव करण्याची शक्यता आहे. आपल्यात गट पाडू शकतं.
त्यामुळे सावध राहा, असा खळबळजनक दावा देखील मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
आपल्याला शांततेत आंदोलन करायचं आहे. जाळपोळ उद्रेक होऊ देऊ नका, असं आवाहन देखील मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला केलं आहे.
ओबीसी समाजातील नेत्यांवर आमचा मराठा समाज पिढ्यान् पिढ्या गुलाल टाकत आलेला
तुम्ही संविधानिक पदावर बसलेले आहात. राज्य शांततेत राहावे, कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये, ही तुमची जबाबदारी आहे.
ते सोडून तुम्ही आता कार्यकर्त्यांना उद्योग सांगायला लागले का?, सभा होऊ देऊ नका वगैरे. मी आता त्यावर काही बोलणार नाही. वेळ आल्यावर त्यावर नक्की बोलेन.
तुम्ही मराठा समाजाची मनं दुखवायला लागले आहात. आमच्या समाजाने कधीही तुमचा द्वेष केला नाही.
तुम्हाला कायम मान-सन्मान, प्रतिष्ठा देत राहिला आहे. आमच्या समाजाने कधीही तुमच्याकडे या जातीचा, त्या जातीचा म्हणून पाहिलेलं नाही.
ओबीसी समाजातील नेत्यांवर आमचा मराठा समाज पिढ्यान् पिढ्या गुलाल टाकत आलेला आहे.
आज आमची पोरं अडचणीत आली आहेत, तर तुम्ही म्हणता ओबीसीमध्ये येऊ नका. आरक्षण खालचं घ्या आणि वरचं घ्या, असे सांगता, असा सवालही मनोज जरांगे पाटील यांनी केला.
0 Comments