धक्कादायक घटना.. पहाटे साडेचार वाजता जावयाने सासूचा काढला काटा; मनात होता फक्त तो एक राग…
डिग्रस कऱ्हाळे येथे पत्नीसोबत शाब्दीक वाद झाल्यानंतर गळ्यावर जोराची लाथ मारली, त्यानंतर दोरीने गळा आवळून पत्नीचा खून केल्याची घटना
रविवारी सकाळी उघडकीस आली होती. हिंगोली ग्रामीण पोलिसांनी आरोपी पतीला तातडीने ताब्यात घेतले आहे.
योगीता संतोष कऱ्हाळे (२८) असे मयताचे नांव असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही घटना ताजी असताना आज वसमत येथे पुन्हा एक धक्कादायक घटना घडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
वसमत येथील झेंडाचौक भागात कौटूंबिक वादातून जावयाने सासूचे दगडावर डोके आपटून खून केल्याची घटना
आज सोमवारी पहाटे साडेचार वाजता घडली आहे. पोलिसांनी आरोपी जावयास ताब्यात घेतले आहे. शेवंताबाई वंजे (७५) असे मयत महिलेचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत येथील कविता यांचा विवाह श्रीरामपूर तालुक्यातील टाकळी बाण येथील बाबासाहेब सिनगारे (४८) याच्या सोबत झाला होता. त्यांना एक पाच वर्षाची मुलगी आहे.
मात्र मागील चार वर्षापासून त्यांचे वाद होऊ लागले होते. त्यामुळे बाबासाहेब हा कविताला मारहाण करीत होता. त्यामुळे कविता तिच्या मुलीसह वसमत येथे माहेरी राहण्यासाठी आली होती. त्यानंतरही तो कविताकडे येत होता.
दरम्यान,रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता तो वसमत येथे आला होता. मात्र त्याच्या मारहाणीच्या भितीपोटी कविता तिच्या बहिणीकडे वाखारी येथे निघून गेली.
आज पहाटे चार वाजण्या्च्या सुमारास बाबासाहेब सिनगारे व त्याची सासु शेवंताबाई यांच्यात वाद सुरु झाला. पत्नी कविता सासरी नांदायला येत नाही, या कारणावरून त्याने शेवंताबाई यांना मारहाण सुरु केली.
त्यानंतर त्यांच्या डोक्याला धरून डोके ओट्यावरील दगडावर आदळले. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. सदर प्रकार कळाल्यानंतर कविता देखील वाखारी येथून तातडीने वसमत येथे आल्या.
या घटनेमध्ये जखमी झालेल्या शेवंताबाई यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकिय अधिकाऱ्यांनी जाहीर केले.
0 Comments