देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार पुन्हा एकत्र येणार?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
शिवसेनेतील १६ आमदार अपात्र ठरणार असल्याची खात्री भाजपाला झाल्यामुळे भाजपाने पुन्हा एकदा अजित पवार यांना साद घातली आहे.त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होणार आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपाबरोबर जाणार असल्याचं ट्वीट केलं आहे.
त्या म्हणाल्या “आज मंत्रालयात कामानिमित्त गेले होते. तिथे एका व्यक्तीने मला थांबवलं आणि एक गमतीशीर माहिती दिली.
त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, १५ आमदार बाद होणार आहेत आणि अजित पवार भाजपाबरोबर जाणार आहेत. तेही लवकरच. महाराष्ट्राच्या राजकारणाची आणखी किती दुर्दशा होतेय ते बघू.” त्यांच्या या ट्विटची सध्या चर्चा होत आहे.
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपात जाणार अशी शक्यता व्यक्त केल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
ईडीने जरंडेश्वर साखर कारखान्याच्या चौकशीतून अजित पवार यांचं नाव वगळलं आहे. अशा बातम्यांमधून संकेत मिळत असतात. असे म्हणत आपल्या विधानात सत्यता असल्याचा दावा देखील दमानिया यांनी केला आहे.
महत्वाचे म्हणजे भाजपाला पाठिंबा देण्याच्या पत्रावर राष्ट्रवादीच्या २३ आमदारांच्या सह्या देखील झाल्या आहेत असेही अंजली दमानिया म्हणाल्या आहेत. दरम्यान दमानिया यांच्या या ट्विटने एकच खळबळ उडाली आहे. तसेच त्यांचं ट्विट जोरदार व्हायरल होत आहे.
महत्वाचे म्हणजे काही दिवसापूर्वी पत्रकार हेमंत देसाई यांनी देखील अजित पवार यांच्या राधाकृष्ण विखे पाटील होऊ शकतो अशी शक्यता व्यक्त केली होती. कारण अजित पवार भाजपाबाबत मवाळ भूमिका घेतात असे देसाई म्हणाले होते.
पहाटेच्या शपथविधीनंतर अजित पवारांच्या नाराजीच्या चर्चा वारंवार होतात. दोन दिवसापुर्वी देखील ते काही काळ नाॅट रिचेबल होते.
अशातच या ट्वीटने या चर्चांना आणखीच वेग दिला आहे. त्यामुळे यावर अजित पवार किंवा भाजप काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.
0 Comments