मोदी सरकारकडून ‘या’ योजनेत मोठा बदल, नागरिकांना बसणार फटका..
मोदी सरकारने 2015 मध्ये असंघटित क्षेत्रातील लोकांच्या सुरक्षित भविष्याचा विचार करुन खास योजना सुरु केली होती. अटल पेन्शन योजना.. असं या योजनेचं नावं.. या योजनेत (APY) ठराविक रकमेची गुंतवणूक केल्यानंतर, निश्चित वयोमर्यादेनंतर नागरिकांना दरमहा 5 हजार रुपयांपर्यंत पेन्शन मिळण्याची तरतूद आहे.
जर तुम्ही भारताचे नागरिक असाल, तुमचे वय 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान असेल आणि तुमचे बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते असल्यास तुम्हाला अटल पेन्शन योजनेसाठी अर्ज करता येतो.. या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर, निश्चित वयोमर्यादेनंतर दरमहा 5 हजार रुपयांपर्यंत पेन्शन मिळते. मात्र, आता या योजनेत काही बदल करण्यात आले आहेत.
अटल पेन्शन योजनेत बदल
मोदी सरकारच्या महत्वाकांक्षी ‘अटल पेन्शन योजने’वर आता मर्यादा आणण्यात आल्या आहेत.. आता आयकर भरणाऱ्या नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. तशा सूचना अर्थ मंत्रालयाने दिल्या असून, येत्या 1 ऑक्टोबर 2022 पासून हा नियम लागू होणार असल्याचे सांगण्यात आले..
केंद्र सरकारच्या नव्या नियमानुसार, आयकर भरणाऱ्या नागरिकांचे ‘अटल पेन्शन खाते’ आता बंद होणार आहे.. त्यातील रक्कम संबंधीत ग्राहकाच्या बचत खात्यावर वळवण्यात येईल. तसेच, आयकर भरणाऱ्यांना यापुढे ‘अटल पेन्शन योजने’त खाते उघडता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आलंय..
केंद्रीय अर्थ मंत्रालयाने अटल पेन्शन योजनेत केलेल्या बदलाबाबतची अधिसूचना जारी केली आहे. नव्या नियमानुसार, आयकर भरणाऱ्यांना आता ‘अटल पेन्शन योजने’साठी अर्ज करता येणार नाही. आयकर भरणाऱ्यांसाठी हा मोठा झटका मानला जात आहे. निवृत्तीनंतर सुरक्षित जीवन जगण्यासाठी ‘अटल पेन्शन योजना’ हा एक चांगला पर्याय होता.
दरम्यान, अटल पेन्शन योजनेत 31 मार्च 2022 पर्यंत ग्राहकांची संख्या 4.01 कोटी झाल्याचे पेन्शन फंड रेग्युलेटर ची आकडेवारी सांगते.. 2021-22 या आर्थिक वर्षात सुमारे एक कोटीहून अधिक लोकांनी या योजनेत नोंदणी केल्याची माहिती देण्यात आली.. मात्र, आता त्यावर मर्यादा आल्याने पुढील काळात ही संख्या कमी होण्याची शक्यता आहे..


0 Comments