काय ती जळजळ...काय ती रडारड...काय ते वाकडं उभारणं : शहाजीबापूंचा भास्कर जाधवांवर निशाणा
एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदनाच्या भाषणावेळी भास्कर जाधव यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार टीकास्त्र सोडले होते.
सोलापूर : काय झाडी, काय डोंगार, काय हाटील या आपल्या अनोख्य भाषाशैलीमुळे संपूर्ण राज्यात परिचित झालेले सांगोल्याचे शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजी पाटील यांनी पुन्हा एकदा त्याच भाषेत शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांचा समाचार घेतला. जाधवांच्या विधानसभेतील भाषणाचा दाखला देत ‘काय तो आवेश..काय ती जळजळ.. काय ती रडारड...काय ते वाकडं उभा राहणं...OK आहे सगळं...’ म्हणत शहाजीबापूंनी भास्कर जाधवांवर हल्लोबाल केला.शिवसेनेचे गुहागरचे आमदार जाधव यांनी विश्वासदर्शक ठरावानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदनाच्या भाषणावेळी बंडखोर आमदारांवर जोरदार टीकास्त्र सोडले होते. ज्यांना ईडीच्या नोटिसा आल्या, त्यांच्याच घरापुढे आता केंद्र सरकारची सुरक्षा आहे. ईडीच्या नोटिशीमुळेच यातील बहुतांश आमदार शिंदे गटात गेले आहेत, असा घाणाघात जाधव यांनी घातला होता.भास्कर जाधव यांच्या विधानसभेतील भाषणाला सांगल्याचे शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांनी ट्विटच्या माध्यमातून उत्तर दिले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, भास्कर जाधव विधानसभेचा संजय राऊत झाला होता आज. काय ते आवेशात भाषण... काय ती जळजळ, काय ती रडारड... काय ते वाकडं उभं राहणं... OK आहे सगळं.. असे म्हणून त्यांनी जाधवांवर निशाणा साधला होता.
भास्कर जाधवांचे शिंदेंना आवाहन
एकनाथ शिंदेच्या कोकणातील कामामुळे मी भारावून गेलो होतो. मी शिंदे यांना भेटण्यासाठी त्यांच्या दालनात दोन-तीन वेळा गेलो. त्यांची फक्त एकदाच भेट झाली. ते माझ्याशी एकदाही बोलले नाहीत. एकनाथ शिंदे आजही सांगतात मी शिवसैनिक आहे. एकनाथ शिंदे आपण मुख्यमंत्री झालात तुमच्यावर खूप जबाबदारी आहे. तुम्ही माझ्याशी कधी बोलत नव्हता. पण, एकनाथ शिंदे तुम्हाला भाजप लढवत आहेत, या लढाईत रक्तपात होईल तो शिवसेनेचा. शिवसेना संपविणे हा यांचा एककलमी कार्यक्रम आहे. त्यामुळे शिवसेना वाचवण्यासाठी शिंदेसाहेब एक पाऊल मागे या, असे आवाहन भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना केले होते.


0 Comments