महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात तृणमूल काँग्रेसची एन्ट्री, ममता दीदींची थेट आमदारांना ऑफर!
मुंबई – राज्यातील राजकीय संकट कायम आहे. शिवसेनेच्या बहुसंख्य आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड पुकारलाय. सर्व बंडखोर आमदार यावेळी गुवाहाटीमधील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये मुक्कामाला आहेत. राज्यातील या राजकीय संकटात आता तृणमूल काँग्रेसचे एन्ट्री झाली आहे. गुरूवारी गुवाहाटीमधील हॉटेलच्या बाहेर तृणमुलच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केले. त्यानंतर आता बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या सर्व प्रकरणात भाजपाला लक्ष्य केलंय.
प्रसिद्ध वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपावर महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. पूरग्रस्त आसाममध्ये आमदारांना का पाठवलं जात आहे? असा सवाल त्यांनी विचारलाय. महाराष्ट्रातील आमदारांना बंगालमध्ये पाठवा, आम्ही त्यांचं आदरातिथ्य करू, अशी ऑफर ममता दीदींनी दिली आहे.
ममता बॅनर्जी यांनी भाजपावर लोकशाही गळा घोटल्याचा आरोप केलाय. भाजपानं संघराज्याची रचना पूर्णपणे उद्धवस्त केल्याचं आपल्याला दु:ख आहे, असं त्यांनी म्हंटलंय. त्याचवेळी ममता बॅनर्जी यांचे भाचे आणि तृणमूल खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सर्मा यांच्यावर टीका केलीय.
‘हिमंत बिस्वा सर्मा यांची प्राथमिकता स्पष्ट आहे. सरकार बंडखोर आमदारांचं यजमानपद करत असून दिल्लीतून येणाऱ्या आदेशांचं पालन करण्यात व्यस्त आहे. महाराष्ट्रातील सरकार पाडण्याचे प्रयत्न केल्यापेक्षा मुख्यमंत्र्यांना राज्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा करण्यात रस असता तर…’ अशा आशयाचं ट्विट बॅनर्जी यांनी केलं आहे.
शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचा यापूर्वी गुजरातमधील सुरतमध्ये मुक्काम होता. त्यानंतर त्यांनी गुवाहाटी गाठलं आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी विरोधकांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आसाम आंतरराष्ट्रीय राजकारणाचं केंद्र झालं तर आपल्याला आनंद आहे, कारण त्यामुळे राज्यातील महसुलात वाढ होण्यास मदत होईल, असं उत्तर सर्मा यांनी दिलंय.


0 Comments