सोलापूर : बालविवाहाला मुख्याध्यापकही जबाबदार ?
सोलापूर - बालविवाहात सोलापूर हे राज्यात अव्वल स्थानावर असून , ही ओळख पुसण्याची जबाबदारी आता ग्रामसेवकांबरोबरच जिल्हा परिषद व माध्यमिक शाळांमधील मुख्याध्यापकांवरही सोपविण्याचे शासन स्तरावर विचाराधीन आहे . प्रत्येक शाळेला मुख्याध्यापक आहेत , पण ग्रामसेवकांची पदे रिक्त असल्याने एकाच ग्रामसेवकाकडे तीन - चार गावांचा पदभार आहे .
त्यामुळे मुख्याध्यापकांनी त्यांच्या शाळेतील सहावी ते अकरावीच्या मुलींच्या पालकांचे प्रबोधन केल्यास ही अनिष्ठ प्रथा रोखू शकते , असा त्यामागील हेतू आहे . सोलापूर जिल्ह्यात जानेवारी २०२० ते एप्रिल२०२२ पर्यंत जवळपास १४७ बालविवाह रोखण्यात आले आहेत . राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत हे प्रमाण सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक आहे . वास्तविक पाहता , गावस्तरावरील बालविवाह बालविवाह रोखण्यासाठी बालप्रतिबंधक अधिकारी म्हणून ग्रामसेवकाला अधिकार आहेत .
तालुकास्तरावर तालुक्याचा स्वतंत्र अधिकारी आहे .सोलापूर जिल्ह्यात करमाळा व मंगळवेढ्यासाठी तालुका बालसंरक्षण अधिकारी सध्या नाहीत . दुसरीकडे , जिल्ह्यातील एक हजार १ ९ ग्रामपंचायतींमध्ये ९ ५१ ग्रामसेवक असायला हवेत , पण सध्या ११५ ग्रामपंचायतींना ग्रामसेवकच नाहीत . त्यामुळे मुख्याध्यापकांवरही आता त्याची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे .
दरम्यान , बालविवाह रोखले आणि मुलींचा शिक्षणातील टक्का वाढविल्याच्या कामाची दखल घेऊन झेडपी शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना ग्लोबल पुरस्कार मिळाला . आज त्याच मुद्द्यांवर प्रभावीपणे काम करण्याची गरज असून , शिक्षकांच्या( मुख्याध्यापक ) माध्यमातून ही प्रथा थांबविता येणे शक्य आहे . गावात किंवा शहरात बालविवाह होत असल्यास संबंधितांनी १० ९ ८ या चाइल्ड लाइनच्या क्रमांकावर कॉल करावा , असे आवाहन करण्यात आले आहे .


0 Comments