डॉ बाबासाहेब आंबेडकरांमुळे मानवी जीवनाला जगण्याला खरी प्रतिष्ठा प्राप्त झाली
डॉ बाबासाहेब देशमुख प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र पुरोगामी युवक संघटना-शे. का.प…
उद्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने
प्रदेशाध्यक्ष डॉ.बाबासाहेब देशमुख महाराष्ट्र पुरोगामी युवक संघटना-शेतकरी कामगार पक्ष यांनी मांडलेलेे अभ्यासपूर्ण मत..
साहेब -पिण्याच्या पाण्यापासून तर समाजात आदराने राहण्यापर्यंत, आरक्षणापासुन ते महिलांच्या न्याय हक्कापर्यंत , सर्व धर्मीयांना शिक्षणापासुन ते अनमोल मतदानापर्यंत व्यवसायापासुन ते नोकऱ्यापर्यंत सगळे उपकार तुमचेच साहेब…
१४ एप्रिल ही तारीख तमाम भारतीयांच्या हृदयावर कोरलेली आहे. पिढ्या न पिढ्या दारिद्र्यात पिचलेल्या, शोषित-वंचित समाजाला निराशेच्या, आत्मवंचनेच्या गर्तेतून खेचून उज्वल वर्तमानाची व भविष्याची निळी पहाट दाखवणाऱ्या, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा हा जन्मदिन.
“आयुष्य मोठे असण्यापेक्षा महान असावयास हवे” हे शब्द सर्वार्थाने सार्थ करणारे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर..
हे उपेक्षितांचे आणि वंचितांचे तारणहार, समतेचे दीपस्तंभ, अस्पृश्यता निवारक, शिक्षित व भयमुक्त पददलित समाजाचे निर्मिक महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त नतमस्तक होणे गरजेचे आहे.
स्वतंत्र भारताची सार्वभौम जगप्रसिद्ध अशी राज्यघटना लिहून आपणा भारतीयास सर्व प्रकारची ताकत दिली.या घटनेच्या आधारे भारत देश तर चालतोच चालतो आहे .संपूर्ण देशाला मार्गदर्शन करणारी, नियंत्रित करणारी, संपूर्ण देशाचा विकास घडवून आणणारी, देशातील माणसांना माणुसकीचे, मान सन्मानाचे आणि नैतिकतेचे दर्शन घडविणारी राज्यघटना संपूर्ण जगाला आदर्शवत अशी ठरलेली आहे, देशातील सर्व जाती, धर्म, पंथ, लिंग भेद इत्यादीपासून संरक्षण देणारी राज्यघटना डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी लिहली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रचंड मेहनत घेऊन भारतीय संस्कृती व विचारधारा विचारात घेऊन रात्रंदिवस काम करुन एक उत्तम, आदर्श ग्रंथ लीहले तसेच स्वत: आजारी असताना देखील दोन वर्षे 11 महिने व सतरा दिवस सातत्याने, समतोल विचारांचे कल्याणकारी संविधान देशाला अर्पण करुन आंम्हाभारतीयावर फार मोठे उपकार केले आहेत.
भारताचा वैधानिक, औद्योगिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक संस्कार, संस्कृती व मुल्यविषयक असा सर्वांगीण विकास गतिमानतेने होणे, भारत सर्वार्थाने स्वावलंबी बनविणे, भारतातील कुपोषण, दारिद्य्र, शोषण व विषमता नाहीशी होणे, रोजगार निर्मिती करणे, जगातील इतर देशांना प्रगतीसाठी प्रचंड मदत करण्याची क्षमता निर्माण करणे आणि भारत देश संपूर्ण जगाचा शांततामय व कल्याणकारी व विकसनशील देश बनविण्याकडे घटनात्मक तरतुदींचा विचार केला तर संविधानाचे महत्व आंम्हा भारतीयांच्या लक्षात येते .
समाजाची पुनर्रचना, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्यायव्यवस्था या तत्वावर व्हायला हवी. जातीभेदाचे निर्मुलन होऊन सर्वांना समान संधी मिळावी ,समताधिष्ठीत समाजरचना स्थापन होऊन सर्वांना मानवी हक्क प्राप्त व्हावेत हे महात्मा फुलेंचे गृहीतक होते व त्यांच्या विचारांचा वारसा बाबासाहेबांनी स्वीकारुन तो समृद्धही केला.तसेच संवीधानाची निर्मीती करीत असताना छत्रपती शिवरायांच्या राज्य कारभाराचा आदर्श समोर ठेवला होता.
शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा हा मूलमंत्र देतानाच जाणीवेचा विस्तव विझू देऊ नका या डॉ. बाबासाहेबांच्या शिकवणूकीचे आपण सर्वांनी पालन केले पाहिजेच
योजना कोणी केली ते न पाहता ती कशी आहे पाहा हे त्यांचे वाक्य आज ही सर्वार्थाने खरे आहे गरज आहे ती अंमलात आणण्याची सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याचे त्यांचे अलौकिक व्यक्तिमत्व होते. मानव स्वंयपूर्ण व भयमुक्त झाला पाहिजे हा त्यांचा आग्रह होता, त्यांनी दिलेल्या प्रेरणेमुळेच मानवी जीवनाला प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे हे विसरता कामा नये आणि म्हणून ज्यांच्या ऋणातून आपण कधीच मुक्त होऊ शकत नाही. त्यांच्या त्यागाची आपण कधीच बरोबरी करु शकत नाही
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, त्यांचे व्यक्तिमत्त्व आपल्या सर्वांसाठी प्रेरणास्त्रोत आहेत.
ज्यांनी आपल्याला सर्वसमावेशक संविधान दिले ,ज्यांनी प्रत्येक वर्गाचे कल्याण संभव आहे व आपले संपूर्ण जीवन सामाजिक समरसतेसाठी कार्य करणाऱ्या ,भारतीय जनमानसांत उदारमतवादी विचारांचं रोपटं कृतीद्वारे रुजवत सामाजिक न्यायाची प्रेरणा बनलेल्या महामानवास आदरपूर्वक स्मरण-नमन-वंदन..
या जयंती दिनी समता, स्वातंत्र्य, बंधुता या मानवी मूल्यांची जपणूक करणारा, आधुनिक विचारांची कास धरणारा, परिवर्तनाकडे कूच करणारा, डॉ. बाबासाहेबजी आंबेडकर यांना अपेक्षित असा भारत घडवण्याचा संकल्प आपण सर्व भारतीयांनी करण्याचे आवाहन पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ बाबासाहेब देशमुख यांनी केल्याची माहीती प्रसिद्ध प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली….
0 Comments