रानडुकराने शेतकऱ्याला फाडून टाकले !
यवतमाळ : आपल्या शेतावर निघालेल्या एका शेतकऱ्यावर हल्ला करून रानडुकराने अक्षरशः त्यांचे शरीर जागोजागी फाडून टाकल्याची घटना घडली असल्याने शेतकरीवर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शेतीला पाणी देण्यासाठी रात्रीच वीज मिळत असल्याने साप, डुक्कर अशा विविध प्राण्यांपासून शेतकऱ्याच्या जीविताला धोका होऊ शकतो त्यामुळे शेतीसाठी दिवस वीज द्यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी करीत आहेत. त्यांच्या आंदोलनाकडे शासनाचे दुर्लक्ष झाल्याने स्वाभिमानीचे कार्यकर्ते शासकीय कार्यालयात साप घेऊन जाऊ लागले आहेत. रात्री शेतात पिकांना पाणी देताना आढळलेले प्राणी, साप घेऊन सरकारी कार्यालयात सोडण्याचे आवाहन शेतकऱ्यांना शेट्टी यांनी केले होते. शेतकऱ्यांना जंगली प्राण्यांचा किती धोका आहे याची साक्ष देणारी ही घटना आहे.
आमडी येथील ही घटना तर भर दुपारची आहे. ६४ वर्षे वयाचे मधुकर भुरजी बावणे हे शेतकरी नेहमीप्रमाणे आपल्या शेताकडे निघालेले होते. यावेळी अचानक आलेल्या रानडुकराने थेट त्यांच्यावर हल्ला केला. बावणे यांनी प्रतिकार केला पण डुकराचा हल्ला एवढा जोरात होता की शेतकरी मधुकर बावणे त्याच्यापुढे कमी पडू लागले. ६४ वर्षांचे वय असले तरी या शेतकऱ्याने रानडुकराशी झटपट केली. चवताळलेल्या रानडुकराने मात्र बावणे यांच्या शरीराचे लचके तोडायला सुरुवात केली. मानेवर, छातीवर, पायावर आणि पोटावर लचके तोंडात डुकराने शेतकऱ्यास जागोजागी फाडून काढले.
बावणे यांचे वय आणि रानडुकराची ताकद यामुळे शेतकऱ्याचे या डुकरापुढे काही चालले नाही. शेतात बराच वेळ दोघात झटपट सुरु होती. रानडुकराच्या या आक्रमक हल्ल्याने शेतकरी बावणे हे जखमी झाले होते. रक्ताळलेल्या शरीराने ते या रानडुकराला प्रतिकार करीत स्वतःला वाचविण्याचा प्रयत्न करीत राहिले पण डुकराने त्यांना जागोजागी फाडून काढले. दरम्यान हा प्रकार आजूबाजूंच्या शेतकऱ्यांच्या लक्षात आला. बाजूचे काही शेतकरी धावून आले आणि त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर मात्र रानडुक्कर घाबरले आणि पळून गेले. त्यामुळे बावणे यांचा जीव वाचला. या हल्ल्यात गंभीररित्या जखमी झालेल्या या शेतकऱ्यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
परिसरात चिंता !
सदर परिसरात रानडुकराचा उपद्रव नेहमीच होत असतो. रानडुकरे पिकांचे तर नुकसान करत आहेतच परंतु एका शेतकऱ्यावर डुकराने जीवघेणा हल्ला केल्याने परिसरातील शेतकरी धास्तावले आहेत. यापूर्वीही शेतीची कामे करताना अनेक शेतकऱ्यावर डुकराने हल्ले करून जखमी केले आहे परंतु हा हल्ला भलताच जीवघेणा होता. आजूबाजूचे शेतकरी मदतीला आले नसते तर शेतकऱ्याच्या जीविताला देखील धोका होण्याची शक्यता होती. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी अस्वस्थ असून रानडुकरांची मोठी भीती त्यांच्या मनात घर करून बसू लागली आहे.

0 Comments